Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 October, 2010

येडियुराप्पांची आज सत्त्वपरीक्षा!

अपात्र उमेदवारांना मतदानाचा हक्क नाही
बंगलोर, दि. १३ : कर्नाटक विधानसभेत उद्या (दि. १४) सकाळी ११ वाजता कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात येडियुराप्पा सरकार विश्वास ठराव मांडणार आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये दुसऱ्यांदा एखादे सरकार विश्वास ठरावाला सामोरे जाण्याची भारतीय इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, उद्याच्या मतदान प्रक्रियेत भाग घेऊ द्यावा ही अपात्र ठरविण्यात आलेल्या पाच अपक्ष आमदारांची मागणी कर्नाटक उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
अपात्र ठरविण्यात आलेल्या १६ आमदारांच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालय सोमवारी फैसला सुनावणार असल्याने उद्याच्या विश्वास ठरावाच्या वेळी हे सोळाही जण मतदानात भाग घेऊ शकणार नाहीत. तथापि, विश्वास मताचे भवितव्य हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहील, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आम्हांला उद्या मतदान करू द्यावे, आमची मते सीलबंद लिफाफ्यात ठेवावीत, यानंतर आम्ही जर विधानसभा सभापतींविरुद्धच्या याचिकेत विजयी झालो, तर आमची मते मोजणीसाठी ग्राह्य ठरवावीत, अशी मागणी अपात्र ठरविण्यात आलेल्या पाच अपक्ष आमदारांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली होती. मात्र, त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
न्यायालयाच्या या निर्णयावर ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या सभापतींच्या निर्णयाला जर न्यायालय योग्य ठरविणार असेल तर सभागृहातील गणितावर कोणताही फरक पडणार नाही. परंतु, जर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला फिरविले तर सरकारला पुन्हा एकदा नव्याने विश्वास ठरावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ सदस्य असून, रविवारी विधानसभा अध्यक्ष बोपय्या यांनी भाजपचे ११ आणि पाच अपक्ष आमदारांना अपात्र ठरविले होते.
भाजप आमदारांसाठी व्हीप जारी
दरम्यान, उद्या विश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी भाजपच्या सर्व आमदारांनी उपस्थित राहावे असा पक्षादेश (व्हीप) पक्षाच्या प्रतोदांनी जारी केला आहे.
२२४ सदस्यसंख्येच्या राज्य विधानसभेत विधानसभाध्यक्षांसह भाजपचे आता १०६ आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांकडून उद्या मांडल्या जाणाऱ्या विश्वास ठरावावरील मतदानात अपात्र १६ आमदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा विश्वास ठराव पुन्हा एकदा जिंकतील, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
कर्नाटकच्या राज्यपालांना हटवा
भाजपची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली, दि. १३ : कर्नाटकप्रश्नी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची आज भेट घेतली. "आकस ठेवून भेदभावाची कारवाई करणारे कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांना तात्काळ माघारी बोलवा,' अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात पक्षाच्या एका शिष्टमंडळाने पंतप्रधानांची आज भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले.
"कर्नाटक विधानसभेत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मांडलेल्या विश्वास ठरावावर मतदान घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी केंद्राकडे कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली. त्यांची ही कृती आकसपूर्ण, भेदभावाची आहे,' असे भाजपने पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळात अडवाणी यांच्यासमवेत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली, ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् देखील उपस्थित होते.
""पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम् या दोन्ही नेत्यांची आम्ही आज भेट घेतली व त्यांना कर्नाटक प्रकरणी सविस्तर निवेदन सादर केले. कर्नाटकच्या राज्यपालांनी केलेल्या आकसपूर्ण शिफारशींवरच आम्ही ही भेट घेतली. राज्यपालांना तात्काळ माघारी बोलवा, अशी मागणी आम्ही यावेळी केली,''असे अरुण जेटली यांनी नंतर एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

No comments: