Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 October, 2010

'त्या' १३ आमदारांचे बळपूर्वक 'अपहरण'

कर्नाटकातील सत्तानाट्याला वेगळेच वळण
आमदार अपहरणामागे कॉंग्रेस व 'जेडीयु': भाजपचा स्पष्ट आरोप

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): कर्नाटकातील राजकीय संकटानंतर गोेव्यात आश्रयासाठी आलेल्या १४ पैकी १३ आमदारांचे आज गोवा पोलिसांच्या मदतीने कुमारस्वामी यांच्या लोकांनी येथील ताज एक्झॉटिका या पंचतारांकित हॉटेलांतून अपहरण करून त्यांना दाबोळी विमानतळावर नेलेे. ज्या वेगाने हे सारे नाट्य घडले ते पाहता हा पूर्वनियोजित कट असल्याचे आणि दिल्लीतूनच हा कट शिजल्याचा आरोप विरोधी भाजपने केला आहे. आमदारांच्या एका गटाचे अशाप्रकारे अपहरण करण्याचा अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. या अपहरणामागे कॉंग्रेस आणि जेडीयु असून याकामी सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करण्यात आल्याचा आरोप आज गोव्यातील स्थानिक नेते तसेच कर्नाटकातील प्रमुख नेते तसेच केंद्रीय भाजप नेत्यांनी केला आहे. दरम्यान, कॉंग्रेस आणि जेडीयुने कितीही कारवाया केल्या तरी सोमवारचा विश्वासदर्शक ठराव आम्ही जिंकणारच, असा ठाम विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्यक्त केला आहे.
७ ऑक्टोबर रोजी गोव्यात दाखल झालेल्या ९ भाजप व ५ अपक्ष आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामात स्थानिक भाजप नेते तसेच कर्नाटकातून गोव्यात दाखल झालेले काही नेते आज सलग तिसऱ्या दिवशीही व्यस्त होते. दुपारी ते हॉटेलच्या फाटकापाशी पत्रकारांना भेटणार होते. त्यामुळे पत्रकार भाजप नेत्यांची वाट पाहत तेथेच थांबले होते. दरम्यान बोलणी जवळपास पूर्ण झाली असून दुपारचे भोजन करून बंगलोरकडे निघतानाच पत्रकारांची भेट घेतली जाईल असा संदेश आला. त्यानुसार दुपारी साधारण २.३० वा. पत्रकार तयारीत होते, इतक्यात हॉटेलच्या लॉबीत काही तरी गडबड सुरू असून काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पोलिसांच्या मदतीने कर्नाटकातील आमदारांना पकडून वाहनांमध्ये कोंबल्याची बातमी कोणीतरी आणली आणि पत्रकारांमध्ये एकच गोंधळ उडाला. तोपर्यंत आगेमागे सशस्त्र पोलिस असलेल्या गाड्यांचा ताफा फाटकाच्या दिशेने येताना दिसला.
एकूण सहा गाड्या फाटकापाशी येऊन थांबल्या. सर्वांत पुढे दोन पोलिस वाहने, मध्ये बस त्यानंतर एक आलिशान कार व नंतर पुन्हा दोन पोलिस गाड्या असा हा ताफा होता. त्या गाड्या येऊन थांबताच फाटकाबाहेरील पोलिस व अधिकारीही सक्रिय झाले व त्यांनी पत्रकारांना तसेच इतरांना बाजूला सारून त्या वाहनांना वाट करून दिली. वाहनांचा तो ताफा तशाच सुसाट वेगाने विमानतळाच्या दिशेने निघून गेला. हा सारा प्रकार दोन मिनिटांच्या आत घडला व त्यामुळे नेमके काय घडले हे कोणाला कळले नाही.
असंतुष्ट आमदारांसोबत हॉटेलात असलेले कर्नाटकातील एक मंत्री रेणुकाचार्य मात्र कसेबसे मागे राहिले. झालेल्या प्रकाराबद्दल अत्यंत संतप्त शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करताना, हा चक्क गुंडगिरीचा प्रकार असून सरकारच्या मदतीने आमदारांचे अपहरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्व आमदारांकडील बोलणी संपून ते आज दुपारी बंगलोरला परतणार होते व त्यासाठी विमानही तयार होते. सर्वजण जेवून परतत असतानाच जमीर अहमद गुंजानी व कुमारस्वामी यांच्या हॉटेलमध्ये तयार असलेल्या गुंडांनी सर्व आमदारांना अक्षरशः उचलून गाड्यांत कोंबले व तेथे असलेल्या पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने त्यांना याकामी सक्रिय मदत केली, असे त्यांनी सांगितले. एकंदर प्रकार ज्या पद्धतीने घडला आणि पोलिसांनी अपहरणाच्या कामात ज्या प्रकारे सक्रिय भाग घेतला यावरून यामागे कॉंग्रेस सरकारच आहे याबद्दल शंकाच नसल्याचेही ते म्हणाले.
हा सारा प्रकार घडला तेव्हा हॉटेलमध्ये खासदार श्रीपाद नाईक व गोव्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हेही उपस्थित होते. मात्र इतक्या झटपट सर्व काही घडले की, कोणाला काहीच करता आले नाही. नंतर श्रीपाद नाईक यांनी बाहेर पत्रकारांशी बोलताना कर्नाटकातील भाजप सरकार खाली खेचण्यासाठी अवलंबिलेल्या या रणनीतीचा निषेध केला व त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील असा इशारा दिला. गोव्यातील पोलिस दल ज्या पद्धतीने या एकंदर प्रकरणात वावरले त्यावरून केंद्र सरकारचाही त्याला आशीर्वाद असावा असेही त्यांनी बोलून दाखवले.
आणखी एका वृत्तानुसार, गेले दोन दिवस चालू असलेली असंतुष्टांबरोबरील बोलणी नेतृत्वबदलाच्या मुद्यावर अडून राहिली होती. असंतुष्टांच्या बाकी सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या पण नेतृत्वबदलाच्या मुद्यावर सर्व बोलणी फिसकटल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वजण जेवणाच्या तयारीत असताना हॉटेल लॉबीत त्यांना काही धटींगणांनी उचलले. कुमारस्वामीचे ते हस्तक होते अशी चर्चा नंतर सुरू होती. काल बंगलोरला जाण्याचा बहाणा केलेल्या कुमारस्वामी यांनी गोव्यातच मुक्काम ठोकून हे सारे कारस्थान रचले असावे असा कयास आहे. कर्नाटक भाजपतील हा सारा असंतोष वास्तविक रेणुकाचार्य यांनी सुरू केला होता. त्याचा वणवा भडकत ८ वर गेला व त्याची परिणती आजच्या अपहरणात झाली. शेवटी रेणुकाचार्य मात्र भाजपकडेच राहिले हे विशेष.

No comments: