Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 12 October, 2010

भीतीपोटीच विश्वजित यांची कोलांटी

भाजपचा आरोग्यमंत्र्यांवर तुफान हल्लाबोल
वाळपई, दि. १ (प्रतिनिधी): वाळपई भागांत सुरू असलेल्या व सुरू होणार असलेल्या खाणींना विश्वजित राणे यांचाच आशीर्वाद असून सत्तरीचे अस्तित्वच नष्ट करू पाहणाऱ्या या खाणीसंदर्भात विश्वजित राणे यांनी कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशी भूमिका घेत लोकांच्या भावनांशी खेळ चालवला आहे. लोकांचा खाणींना असलेला विरोध लक्षात घेऊन त्यांनी आता कोलांटी उडी घेतली असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार नरहरी हळदणकर यांनी केला. आज वाळपई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संध्याकाळी ६ वाजता वाळपई येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेतून भाजपने विश्वजित राणेंच्या धरसोड भूमिकेवर तुफान हल्लाबोल केला. यावेळी नरहरी हळदणकर यांच्यासोबत भाजपचे सचिव प्रा. गोविंद पर्वतकर, उल्हास अस्नोडकर, वासुदेव परब, मंडळ अध्यक्ष नारायण परब आदी मान्यवर उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच आपल्या दोना पावला येथील बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विश्वजित राणेंनी लोकांनाच खाणी हव्या असल्याचा दावा केला होता व या खाणींमुळेच सत्तरीतील लोकांची भरभराट होत असल्याचे म्हटले होते. परंतु, आता मात्र ते वृत्तपत्रांतून खाणींच्या बाबतीत आपण लोकांबरोबरच आहोत असा पवित्रा घेत आहेत. आपल्या खाणधोरणासंदर्भात लोकांच्या मनात असंतोषअसल्याचे त्यांना उमगले असून केवळ भीतीपोटीच आता ते खाणींना विरोध असल्याचे भासवत आहेत. मात्र एकदा ही पोटनिवडणूक पार पडली की येथे खाणी सुरू करण्यास त्यांच्याकडूनच प्रयत्न होणार यात शंका नसल्याचे श्री. हळदणकर यांनी पुढे सांगितले.
ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेने सूप धरण्याचे तंत्र सध्या विश्वजित राणे यांनी अंगीकारले आहे असे यावेळी सांगून श्री. हळदणकर म्हणाले की येथील लोकांना खाणी नकोच आहेत. मात्र लोकांचा विरोध आहे म्हणून खाणींना आपलाही विरोध असल्याचे विश्वजित भासवत आहेत. आपल्या स्वार्थासाठी येथील जनतेला गृहीत धरून वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळवण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. आपण कित्येक कोटींची विकासकामे येथे केली आहेत असे सांगणाऱ्या विश्वजित राणेंनी या विकासकामांची यादी सादर करावी असे आव्हानही यावेळी श्री. हळदणकर यांनी दिले व केवळ पाट्या लावण्याखेरीज त्यांच्याकडून कोणतेही कार्य झाले नसल्याची टीका केली.
दरम्यान, यावेळी बोलताना प्रा. गोविंद पर्तवतकर म्हणाले की, साट्रे या गावातील पूल भाजपच्या काळात झाला. केवळ जोडरस्ता राहिला होता. मात्र हे काम विश्वजित राणे यांनी मुद्दामहून मार्गी लावले नाही. आपल्या पायाशी आलात तरच या पुलाचे काम पूर्ण होईल, अशी धमकी त्यांनी साट्रेवासीयांना दिली, असा आरोपही श्री. पर्वतकर यांनी केला.
वाळपई येथील इस्पितळ "पीपीपी' तत्त्वावर सुरू करण्याचा त्यांचा डाव आहे. लोकांच्या पैशांतून उभे राहिलेले हे इस्पितळ सरकारीच राहिले पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी ते विदेशी कंपनीला देण्याचा विश्वजित राणे यांनी घातलेला घाट येथील नागरिक कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत असेही यावेळी श्री. पर्वतकर यांनी सांगितले. आपण पणजीत राहून ही निवडणूक जिंकू शकतो अशा वल्गना करणारे विश्वजित आज पत्नीसोबत वाळपई मतदारसंघात प्रचार करत आहेत, त्यांनी प्रत्येक पंचायतीत पैशांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे, मंडळांना लाखो रुपये वाटले जात आहेत, या सर्वांची चौकशी होणे आवश्यक असल्याचेही श्री. पर्वतकर यांनी यावेळी सांगितले.

No comments: