Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 13 October, 2010

फोंडा नगराध्यक्षांची गच्छंती

अविश्वास ठराव ७-० असा संमत
फोंडा, दि. १२ (प्रतिनिधी): येथील फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्र्वास ठराव सात विरुद्ध शून्य मतांनी आज (दि. १२) दुपारी संमत करण्यात आला. त्यामुळे आता पालिकेला पाचव्या नगराध्यक्षांचे वेध लागले असून नगराध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार नगरसेवक किशोर नाईक हे आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
या पालिकेच्या सत्ताधारी गटातील सहा नगरसेवकांनी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्र्वास ठरावाच्या नोटिशीवर चर्चा करण्यासाठी आज सकाळी पालिका मंडळाची खास बैठक घेण्यात आली. या बैठकीला सरकारी अधिकारी म्हणून कुंकळ्ळी पालिकेचे मुख्याधिकारी शिवाजी बी. देसाई उपस्थित होते. बैठकीला अविश्र्वास ठरावाची नोटीस दिलेले किशोर नाईक, शैलेंद्र शिंक्रे, संजय नाईक, दिनकर मुंडये, व्यंकटेश नाईक, सौ. राधिका नायक, ऍड. वंदना जोग हे सात नगरसेवक उपस्थित होते. अविश्र्वास ठरावावर सही केलेल्या नगरसेविका सौ. दीक्षा नाईक ह्या मात्र गैरहजर होत्या. तसेच नगराध्यक्ष प्रदीप नाईक, उपनगराध्यक्ष व्हिन्सेंट फर्नांडिस, दामोदर नाईक, शिवानंद सावंत, सौ. रुक्मी डांगी या बैठकीला अनुपस्थित होत्या.
प्रशासकीय कामकाज आणि विकासकामांबाबत नगराध्यक्ष नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप नोटिशीमध्ये करण्यात आला होता. या बैठकीला नगराध्यक्ष श्री. नाईक उपस्थित नसल्याने ठरावावर चर्चा होऊ शकली नाही तर केवळ मतदान घेण्यात आले. सत्ताधारी गटातील नाराज नगरसेवकांना विरोधी गटातील दोन नगरसेवकांचेही पाठबळ लाभले आहे. नगराध्यक्षांविरुद्ध अविश्र्वास ठराव संमत झाल्याने सत्ताधारी गटातील धुसफुस मिटविण्यासाठी आमदार तथा गृहमंत्री रवी नाईक यांनी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या कारभारावर नाराज असलेले काही नगरसेवक हे गृहमंत्री रवी नाईक यांचे खंदे समर्थक आहेत.
गेले पाच महिने नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी गृहमंत्री रवी नाईक यांच्यामुळे प्राप्त झाली. या काळात पालिका क्षेत्राचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. कचरा व इतर समस्यांना सोडविण्यास प्राधान्य दिले. आपले चांगल्या प्रकारे करीत असलेले कार्य काही असंतुष्ट नगरसेवकांच्या पचनी न पडल्याने त्यांनी आपल्या विरोधात अविश्र्वास ठराव दाखल केला, असा आरोप नगराध्यक्ष श्री. नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला. गेल्या महिन्यापासून पालिकेकडे कचरा विल्हेवाटीसाठी जागा नव्हती. तरी आपण पालिका क्षेत्रातील कचरा दररोज उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम केले आहे, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.

No comments: