गोवा बचाव अभियानची जहाल टीका
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत हे जनतेला केवळ आश्वासने देत आहेत; ती पाळण्याची तसदी ते कधीच घेत नाहीत नाहीत. जनहिताचा एकही निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमताच नाही. हे सरकार खोटारडे असून मुख्यमंत्री भित्रे आहेत, अशी जहाल टीका आज गोवा बचाव अभियानने केली.
पणजी येथील आझाद मैदानावर अभियानातर्फे २०२१ प्रादेशिक आराखडा रद्द करणे, या आराखड्याअंतर्गत चाललेल्या बांधकामांना स्थगिती देणे, लोकांनी सुचवलेल्या सीआरझेड कायद्याला मान्यता देणे, सहापदरी रस्त्याचा प्रस्ताव नाकारणे आदी मागण्यांवर सरकार वेळकाढू धोरणाचा अवलंब करत असल्याचा निषेध करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर भरपूर तोंडसुख घेतले.
लोकविरोधी कारवाया करून बेकायदा खाणी व कॅसिनोंना उत्तेजन देऊन गोव्याच्या निसर्गाचा सत्यानाश करण्यास पुढे सरसावलेले विद्यमान कॉंग्रेस सरकार हे नालायक आहे, अशा बोचऱ्या शब्दांत आज आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या जाहीर सभेनंतर ठरलेल्या कार्यक्रमानुसार आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर धडक देण्यासाठी निघताच उपस्थित पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. तरीही आंदोलनकर्त्यांनी चर्च स्क्वेअरपर्यंत मोर्चा नेलाच. मात्र तेथे पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यानंतर केवळ पंधराजणांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊ देण्यात आले. गोवा बचाव अभियानच्या निमंत्रक सबिना मार्टीन्स, अरविंद भाटीकर, डॉ.क्लाऊड आल्वारीस व प्रजल साखरदांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्याचे विशेष कार्याधिकारी श्री. वेर्लेकर यांना निवेदन सादर केले व अभियानच्या मागण्यांवर पंधरा दिवसांत निर्णय घेण्याची मागणी केली. नपेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
तत्पूर्वी, आझाद मैदानावरील सभेत आनंद मडगावकर, सबिना मार्टीन्स, अरविंद भाटीकर, डॉ. क्लाऊड आल्वारीस आदींची भाषणे झाली.
Friday 15 October, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment