पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना यंदा चतुर्थीचा "बोनस' मिळाला नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. कदंब महामंडळाची स्थापना झाल्यापासून या कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. केवळ याच वर्षी हा बोनस देण्यात आलेला नाही, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. याविषयी कदंब महामंडळाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना विचारले असता "कदंब महामंडळ पूर्णपणे डबघाईला आल्यामुळे आम्ही या कर्मचाऱ्यांना बोनस देऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी दाखवल्यास पुढे विचार केला जाऊ शकतो,' असे त्यांनी सांगितले. बोनस द्यायचा झाल्यास सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचेही ते म्हणाले.
कदंब महामंडळात सुमारे २ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी त्यांना चतुर्थीला त्यांच्या वेतनानुसार १० हजार रुपयांपेक्षा जास्त बोनस दिला जातो. मात्र यावेळी कोणतेही कारण न देता चतुर्थीला देण्यात येणारा बोनस दिला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. महामंडळाच्या ताफ्यात ३९८ बस गाड्या आहेत. त्यात अजून नव्या बस गाड्या घेतल्या जात आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बोनसकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे.
दुसऱ्या बाजूने कदंब महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचाऱ्यांना बोनस देणे शक्य नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
यंदा बोनस मिळणार नाही, याची माहितीही आम्ही कामगारांना दिली होती, असे दीपक ढवळीकर म्हणाले. कामगार योग्य पद्धतीने काम करीत नाही. त्यांचे कामाकडे लक्ष नसते. त्यामुळे कदंब महामंडळ तोट्यात गेल्याचेही ते म्हणाले. वेळेवर न येणे, बस सोडण्याच्या वेळा चुकवणे, नादुरुस्त झालेल्या बसगाड्याची दुरुस्ती वेळेवर न करणे, अशा तक्रारी श्री. ढवळीकर यांनी सांगितल्या. मात्र गेल्या एका महिन्यात कामगारांचा चांगला प्रतिसाद आहे. तो असाच सुरू राहिल्यास सरकारकडून निधी उपलब्ध करून या कामगारांना डिसेंबर महिन्यात बोनस देण्याचा विचार केला जाईल, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.
Sunday 10 October, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment