Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 October, 2010

प्रभाकर पेंढारकर यांचे निधन
पुणे, दि. ७ : ज्येष्ठ दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचे आज पुण्यात निधन झाले. प्रभाकर पेंढारकरांची "रारंगढांग' ही कादंबरी गाजली होती. ते भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या प्रभाकररावांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
प्रभाकर पेंढारकर यांनी १९५२ ते १९५९ पर्यंत भालजी आणि व्ही. शांतराम यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९६१ पासून त्यांनी फिल्म डिव्हिजन सोबत काम केले. त्यांना सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १९६१ मध्ये "भाव तिथं देव', १९८१ मध्ये "बाल शिवाजी', १९८६मध्ये "शाब्बास सुनबाई' हे चित्रपट काढले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रसृष्टीतील अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

मारिओ लोसा यांना साहित्याचे 'नोबेल'
स्टॉकहोम, दि. ७ : स्पॅनिश भाषेतील आघाडीचे कादंबरीकार मारिओ वर्गास लोसा यांना २०१० सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. लोसा हे ख-या अर्थाने वैश्विक नागरिक असून ते सामाजिक परिवर्तनाचे शिलेदार असल्याचा उल्लेख स्वीडीश अकादमीने केला आहे.
जुलुमी राजवटीच्या विरोधात व्यक्तीच्या प्रतिकाराचे , बंडखोरीचे आणि पराजयाचे प्रत्ययकारी चित्रण आपल्या साहित्यातून रेखाटल्याने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे स्वीडीश अकॅडमीने म्हटले आहे.
पेरुच्या वर्गास ललोसा यांनी आजवर ३० कादंबऱ्या , नाटके असे लेखन केले आहे. त्यात प्रामुख्याने कॉन्व्हरसेशन इन द कॅथडरल आणि द ग्रीन हाऊस या कादंबऱ्यांचा समावेश आहे.
लोसा यांना १९९५ साली सरवॅटेस पुरस्काराने गौरवण्यात आले होते. स्पॅनिश जगतातील साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च बहुमान मानला जातो. लोसा यांनी १९६० साली लिहिलेल्या द टाइम ऑफ हिरो या कादंबरीने त्यांना जगमान्यता मिळवून दिली.

भारताच्या खात्यात आणखी तीन सुवर्ण
नवी दिल्ली, दि. ७ : राष्ट्रकुल स्पर्धेत आज (गुरुवार) चौथ्या दिवशीही सुवर्णपदकांची लूट कायम ठेवली. कुस्तीमध्ये महिलांच्या ५५ किलो वजनी गटात फ्री स्टाईल प्रकारात गीताने, तर नेमबाजीत दहा मीटर पेअर पिस्तुल प्रकारात ओंकार सिंह आणि गुरप्रीत सिंग आणि २५ मीटर पिस्तुल पेअर प्रकारात गुरप्रीत सिंग आणि विजय कुमारने अशी तीन सुवर्णपदकांची कमाई भारताने आज केली.
महिला कुस्तीत गीताने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. राष्ट्रकुलमध्ये भारताने आतापर्यंत १४ सुवर्णपदके, ११ रौप्य व ८ कास्यपदके जिंकून पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. महिला कुस्तीत ६३ किलो वजनी गटात सुमन कुंदा हिने ब्रॉंझ पदक जिंकले. तर, नेमबाजीत रंजन सोधी यानेडबल ट्रॅपमध्ये रौप्य पदक पटकाविले. सकाळी तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला गटाने मलेशियाला मागे टाकत ब्रॉंझ पदक जिंकले.

No comments: