Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 6 October, 2010

वाळपई पोटनिवडणूक प्रक्रियेतून सत्तरीतील कर्मचाऱ्यांना वगळणार

नारायण गाड, तृप्ती राणे व शिवराम वायंगणकर यांची बदली !
पणजी, दि.५ (प्रतिनिधी): वाळपई पोटनिवडणुकीत सत्तरी तालुक्यातील अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची भाजपकडून करण्यात आलेली मागणी निवडणूक आयोगाने गंभीरपणे घेतली आहे. त्यानुसार वाळपईचे उपजिल्हाधिकारी नारायण गाड, संयुक्त मामलेदार तृप्ती राणे व वाळपईचे पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांची इतरत्र बदली करण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती संयुक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी दिली. आरोग्य, कारागिर प्रशिक्षण तथा कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक न करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याच विषयावरून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. हे अधिकारी व कर्मचारी कायम राहिल्यास निवडणूक प्रक्रियेच्या कामात हस्तक्षेप होण्याची आणि बाधा येण्याची शक्यता व्यक्त केली होती.
सदर पोटनिवडणूक शांततेत व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच अद्याप एकही अधिकृत तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचलेली नाही, अशी माहिती यावेळी श्री. नावती यांनी दिली. राजीव गावस यांची निवडणूक अधिकारीपदावरून केलेली बदलीचे समर्पक उत्तर श्री. पर्रीकर यांना देण्यात आले आहे व त्यांनाही ते पटल्याचा दावा नावती यांनी केला.
गावस यांना निवडणुकीचा कोणताच अनुभव नाही व त्यांनी अधिक काळ सचिवालयातच घालवल्याने त्यांनी स्वतः या पदावर न राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. डिचोलीच्या नगराध्यक्षांनीही गावस यांना मुख्याधिकारीपदावरून हटवण्यास हरकत घेणारे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले होते.डिचोलीच्या मुख्याधिकाऱ्यांची वाळपईच्या निवडणूक अधिकारीपदी नेमणूक होऊन त्या नियमाप्रमाणेच ते तिथे राहिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया व अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तिथे नव्या निवडणूक अधिकारीपदी जयंत तारी यांनी ताबा घेतल्याचे स्पष्टीकरण यावेळी नावती यांनी केले.साहाय्यक निवडणूक अधिकारिपदी गौरीश कुट्टीकर यांची नेमणूक झाली आहे. त्यांना निवडणुकीचा दीर्घ अनुभव आहे. निवडणुकीसाठी कर्मचारी नेमणुकीचे अधिकार हे जिल्हाधिकारी व निरीक्षकांकडे असतात. त्यानुसार जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्या आदेशावरून सत्तरी तालुक्याव्यतिरिक्त अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यास मान्यता मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.
निमलष्करी दलाला पाचारण
वाळपई पोटनिवडणुकीसाठी निमलष्करी दलाच्या दोन तुकड्या मागवण्यात आल्याचे नावती यांनी सांगितले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तशी शिफारस करण्यात आली आहे, अशी माहितीही देण्यात आली.
मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी
दरम्यान, वाळपई मतदारसंघात निवडणूक प्रचारकाळात मोठ्या प्रमाणात धान्य वाटप करण्याच्या इराद्याने धान्य खरेदी करण्यात आल्याचा सुगावा निवडणूक आयोगाला लागला आहे. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती नावती यांनी दिली. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त धान्य खरेदी केलेल्या व्यवहारांचा तपशील मागवण्यात येतो व या धान्याचे वाटप मतदारांना भुलवण्यासाठी होते का, याची चौकशी केली जाते,असेही ते म्हणाले.

No comments: