Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 6 October, 2010

भारताचे 'सुवर्णपंचम'

यजमानांनी घेतली द्वितीयस्थानी झेप
नवी दिल्ली, दि. ५ : मोहाली कसोटीतील रोमांचकारी विजयापाठोपाठ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आजचा मंगळवार भारतासाठी अक्षरशः ' गोल्डन'वार ठरला. भारतीय नेमबाजांनी दोन सुवर्णपदकांनी बोहनी केल्यानंतर, तिघा कुस्तीपटूंनी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधत अनोखा ' सुवर्णपंचम ' योग साधला. त्याशिवाय आणखी दोन रौप्य पदकांची लयलूट करत, भारताने पदकतालिकेत द्वितीय स्थानी झेप घेतली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणाऱ्या भारतातील क्रीडाचाहत्यांना भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीने खूष करून टाकले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंदा व विश्वविजेता गगन नारंग यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात ११९३ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यापाठोपाठ अनिसा सय्यद व राही सरनोबत यांनी महिलांच्या २५ मीटर स्पोर्टस् पिस्तुल प्रकारात भारताला दुसरे सुवर्ण जिंकून दिले.
नेमबाजीतील प्रमुख आशास्थान असलेल्या तेजस्विनी सावंतला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले . ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात ती आणि लज्जा गोस्वामी यांनी ११४३ गुणांसह रौप्य जिंकले . सुवर्णपदकापासून त्या केवळ सहा गुण पिछाडीवर होत्या . पुरुषांत दीपक शर्मा व ओंकार सिंग यांना ५० मीटर पिस्तुल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले .
नेमबाजांनी सुवर्णपदकांचे खाते उघडल्यानंतर कुस्तीपटूंनीही सोनेरी कामगिरी केली. रवींदर सिंगने ६० किलो वजनी गटात, संजय सिंगने ७४ किलो वजनी गटात तर ९६ किलो वजनी गटात अनिल कुमार यांनी सुवर्णपदक पटकावत हॅटट्रिक साधली. त्यामुळे भारताने आज दिवसभरात ५ सुवर्ण पदकांची कमाई केली. या कामगिरीमुळे काल सातव्या स्थानावर असलेला भारत पदकतालिकेत थेट दुस-या क्रमांकावर पोहोचला. एकूण काय तर आजचा दिवस भारताच्या क्रीडा इतिहासात खरोखरच सुवर्णाक्षरांनी आणि पदकांनी कोरला गेला.

No comments: