Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 3 October, 2010

मुलायमसिंग यांना मुस्लिमांनीच फटकारले

लखनौ, दि. २ : 'अयोध्या निकालामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना मुस्लिम समुदायात निर्माण झाली आहे.' असा जावईशोध मुस्लिम बांधवांचे वकिलपत्र घेतल्यागत काल मुल्लायमसिंग यांनी लावला होता. "मजहब नहीं सिखाता' म्हणत, आज त्यावर मुस्लिम समाजामध्ये तीव्र पडसाद उमटले.
लखनौ खंडपीठाच्या निर्णयानंतर हिंदू-मुस्लिम दोन्ही समुदायाच्या नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी आणि प्रसार माध्यमांनी दाखवलेल्या परिपक्वतेमुळे एकूणच राष्ट्रीय स्तरावर सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून कुठलेही वक्तव्य करणे उचित ठरणार नाही. अशा वक्तव्यांमुळे वातावरण कलुषित होऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असे इदगाहचे नायब इमाम आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलान खलीद रशीद फिरंगीमहाली यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संघ परिवारासह कुणीही अपरिपक्वतेची जाणीव करून दिलेली नाही ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यामुळेच यानंतर कट्टरवादी शक्ती पुन्हा डोके वर काढू नये याची काळजी घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
लखनौ खंडपीठाच्या निर्णयामुळे मुस्लिम समुदायात थोडे निराशेचे वातावरण असले तरी देशहित आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याच्या दृष्टीने संयम बाळगण्याची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले. दारूल मुसीन्नफीन या इस्लामी संशोधन संस्थेचे नेते मौलाना मोहम्मद उमर यांनीदेखील फिरंगीमहाली यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. मुलायमसिंग यादव यांनी मुस्लिम समुदायाची भावना व्यक्त केली असली तरी त्यासाठी ही वेळ योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. शिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना मोहम्मद मिर्झा अथर यांनीदेखील मुलायमसिंग यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. निकालानंतर देशात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असताना मुलायमसिंग यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने अशाप्रकारची विधाने करणे योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे एका पक्षाला आनंद आणि दुसरा पक्ष नाराज होणे साहजिक आहे आणि या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा किंवा चर्चेच्या माध्यमातून सामोपचाराने तोडगा काढण्याचा पर्यायदेखील खुला आहे. त्यामुळेच याप्रसंगी अशाप्रकारच्या विधानांची काहीएक गरज नाही, असेही अथर यांनी सांगितले.
अयोध्येबाबतचा निवाडा म्हणजे
गांधीजींचा आशीर्वाद : नरेंद्र मोदी
पोरबंदर : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या मालकी हक्काबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेला निर्णय म्हणचे महात्मा गांधीचा आशीर्वादच असून, रामराज्याचे गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा एक शुभसंकेत आहे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी आज गांधीजींचे जन्मस्थान असलेल्या कीर्ती मंदिर येथे जाऊन महात्मा गांधी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. या मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्यांची प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पुस्तिकेत नरेंद्र मोदी आपले हे मत व्यक्त केले आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या तरुण वयापासून ते मरणापर्यंत रामाचेच नाव घेतले होते. देशाला समृद्ध करण्यासाठी रामराज्याची कल्पनाही गांधीजींनीच मांडली होती. त्यामुळे महात्मा गांधींचे आजच्या परिस्थितीतही प्रेरणादायी आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गांधीजयंतीच्या दोन दिवस आधी अयोध्या प्रकरणाचा निकाल आला ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि गेल्या ६० वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला हा वाद अखेर न्यायालयाने सोडवला, असेही मोदी पुढे म्हणाले. गांधीजयंतीनिमित्त कीर्ती मंदिर येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर नरेंद्र मोदी लगेच येथून ३० किमी अंतरावर असणाऱ्या शनिदेव मंदिराकडे रवाना झाले.

No comments: