Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 October, 2010

मुख्यमंत्र्यांविरोधातच 'मुस्लिमांचो एकवट'

मडगावात कॉंग्रेसचे धाबे दणाणले
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): पालिका निवडणुकांचा प्रश्र्न ज्वलंत बनलेला असताना आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मतदारसंघात झालेल्या एका आकस्मिक घडामोडीत मडगावातील तमाम मुसलमानांनी एकत्र येऊन मडगाव पालिका निवडणुकीसाठी आपले स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस बचावाच्या पवित्र्यात आली. आमचा हा निर्णय फक्त पालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून आगामी विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचे संकेतही त्यामुळे मिळाले आहेत.
शहरातील विविध मुस्लिम नेत्यांनी आज मालभाट येथे जामा मशिदीच्या सभागृहात घेतलेल्या एका पत्रपरिषदेत ही घोषणा केली. यावेळी शेख इफ्तिकार, शेख महंमद उस्मान, महंमद नझीर, कासीमखान, जामासाब बेपारी, हाजी इब्राहिम, अब्दुल मतीन कारोल व अब्दुल्ला कादर गली यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, किमान सात जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले जाणार असून त्यांची नावेही पक्की करण्यात आली आहेत. पॅनेलचे नावही ठरलेले आहे. मडगाव पालिका निवडणुकीसंदर्भात सध्या उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर काय निवाडा होतो ते पाहून बहुधा उद्याच त्याची घोषणा केली जाईल.
मुस्लिमांच्यागठ्ठा मतांमुळेच गोव्यात कॉंग्रेसला सत्ता उपभोगता आली ही वस्तुस्थिती आहे; कॉंग्रेसकडून मुसलमानांचा वापर "टिश्यू पेपर' सारखा केला जात आहे. या समाजाला मागासलाच ठेवून केवळ निवडणुकांवेळी भरमसाठ आश्र्वासने द्यावयाची व निवडणुका आटोपताच त्याकडे दुर्लक्ष करायचे हीच आज कॉंग्रेसची कार्यपद्धती बनली आहे. कामत यांच्या कार्यकाळांत त्याला जास्त बळकटी आली, असा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाने मुसलमानांचा केवळ वापर केला असे सांगताना मडगावच्या कब्रस्तानचे त्यांनी उदाहरण दिले. गेली ३० वर्षे त्याच्या नावाने फक्त सत्ता उपभोगण्याचे कारस्थान चालले आहे. गोव्यात कॉंग्रेस फक्त मुसलमानांमुळे सत्तेवर आहे असे सांगून कॉंग्रेसचे सहा ते सात आमदार केवळ मुसलमानांमुळे निवडून येतात हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही बजावले. सरकारने या समाजाच्या कोणत्याही समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले नाही. संपूर्ण गोव्यात या लोकांचे समाजगृह नाही, स्वतः च्या शाळा इमारती नाहीत; परंतु हे सगळे विषय बाजूला ठेवून समाजाला सध्या कब्रस्तानचा मुद्दा घेऊन बसावे लागले आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर त्यांनी मुसलमानांना झुलवत ठेवत असल्याचा आरोप केला. ते मुसलमानांमुळेच मुख्यमंत्री होऊ शकले याचे भान त्यांनी ठेवायला हवे. "सर्वांना नेहमीच मूर्ख बनविता येत नाही,' अशी जी म्हण आहे ती त्यांना तंतोतंत लागू पडते, असे सांगून कब्रस्तानचा प्रश्र्न असाच भिजत राहण्यास तेच जबाबदार असल्याचा संतप्त आरोपही या नेत्यांनी यावेळी केला.
आज विधानसभेत व नगरपालिकेतही मुस्लिम प्रतिनिधी नाही. त्याचमुळे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असावे याच विचारातून मडगावातील तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. या मुद्यावर सर्व मुस्लिम एकत्र आहेत. मडगावातील काही प्रभागात मुस्लिमांचे प्राबल्य असताना ते प्रभाग अन्य जाती वा वर्गांसाठी राखीव ठेवण्याचे घाणेरडे राजकारण मुख्यमंत्री खेळले आहेत व हे आरक्षण, प्रभाग आखणी यासारखी कामे करताना पुरेसा कालावधीही न ठेवता सर्वांवर अन्याय करण्यात आल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसने आता काही ठिकाणी उमेदवारी दिली तर भूमिका काय असेल, असे विचारता मुस्लिम बहुसंख्याक प्रभाग इतरांसाठी राखीव केल्यावर आता प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही तसेच झरीना शहा सारख्या मुस्लिम समाजात स्थान नसलेल्यांना उमेदवारी दिल्यानेही समस्या सुटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पॅनलबाबत आज रात्री अंतिम निर्णय होऊन उद्या शुक्रवारी नावे जाहीर केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

No comments: