Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 October, 2010

राजू गावस यांची बदली कशासाठी?

पर्रीकरांचा निवडणूक अधिकाऱ्यास खडा सवाल
वाळपईची पोटनिवडणूक
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): वाळपई पोटनिवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असताना व आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना अचानकपणे निवडणूक अधिकारी राजू गावस यांची बदली करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अशा पद्धतीने कोणतेही कारण नसताना निवडणूक अधिकारीच बदलण्याचा हा प्रकार, तसेच निवडणुकीसंबंधी इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट देऊन यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुख्य निवडणूक अधिकारी गणेश कोयू हे रजेवर गेल्याने यावेळी निवडणूक अधिकारी नारायण नावती यांची भेट घेतली. वाळपई पोटनिवडणुकीसाठी नेमण्यात आलेले निवडणूक अधिकारी राजू गावस यांना निवडणुकीचा अनुभव नाही, असे या बदलीमागचे कारण सांगितले जाते. मुळात सुरुवातीलाच निवडणूक अधिकाऱ्यांची निवड करताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व आत्ताच असा कोणता साक्षात्कार निवडणूक आयोगाला झाला, असा खडा सवाल पर्रीकरांनी यावेळी केला. मात्र राजू गावस यांच्या बदलीबाबत समर्पक उत्तर श्री. नावती यांना देता आले नाही.
वाळपईतील विद्यमान दोन्ही मामलेदार हे खुद्द सत्तरीचेच असल्याने त्यांची निवडणूक काळात बदली करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. वाळपई पोटनिवडणुकीसाठी वाळपई किंवा सत्तरीतील सरकारी कर्मचारी तसेच विश्वजित राणे यांच्याकडे असलेल्या खात्यांतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासही भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंबंधी योग्य ती खबरदारी घेण्याचे ठोस आश्वासन भाजपला दिले.
-----------------------------------------------------
दीपाजी राणे यांची माघार
वाळपई, दि. ४ (प्रतिनिधी): या पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले दीपाजी राणे यांनी आज (सोमवारी) निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी दुरंगी लढत या मतदारसंघात रंगणार आहे. हा सामना अटीतटीचा होईल यात शंकाच नाही. भाजपने वाळपई भाग पिंजून काढण्यावरच प्रामुख्याने भर दिला आहे.

No comments: