Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 2 July, 2010

खोटी आश्वासने बंद करा

'गोवा बचाव अभियान'चा मुख्यमंत्र्यांना टोला
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): 'प्रादेशिक आराखडा २०२१' जाहीर करण्यासंबंधी मुख्यमंत्री दिगंबर कामत खोटारडेपणा करीत असल्याचा गंभीर आरोप गोवा बचाव अभियानाने केला आहे. सरकारच्या तीन वर्ष पूर्तीच्या सोहळ्यात पेडणे व काणकोणचा आराखडा जूनअखेरीस खुला होईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते तेदेखील हवेतच विरले. खोटी आश्वासने देण्याची मुख्यमंत्र्यांची सवय म्हणजे जनतेच्या तोंडावर थप्पड मारण्याचाच प्रकार आहे, असा टोला यावेळी लगावण्यात आला.
आज येथे बोलावलेल्या पत्रपरिषदेत अभियानाच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स यांनी ही टीका केली. याप्रसंगी अभियानाच्या सचिव रीबोनी शहा, मिंगेलिन ब्रागांझा आदी हजर होते. प्रादेशिक आराखडा २०२१ जाहीर होण्यापूर्वी खुलेआमपणे सुरू असलेला गोव्याचा विद्ध्वंस रोखा,असे आवाहन करून एफएआर ५० पर्यंत मर्यादित ठेवावा अशी मागणी केली आहे. नगर नियोजन खात्याकडून सध्या अनेक संभ्रमित करून टाकणारे नकाशे दिले जात आहेत व त्यामुळे जनतेच्या मनात अधिक घोळ निर्माण झाल्याचा ठपकाही श्रीमती मार्टिन्स यांनी ठेवला. पेडणे व काणकोणचा आराखडा तयार झाला असतानाही तो उघड करण्यास टाळाटाळ होत असल्याने संशय बळावल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यातील १८९ पंचायतींपैकी केवळ २७ पंचायतींचा व दोन पालिकांचा आराखडा तयार झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
मेगा प्रकल्पांकडून संपूर्ण जागा बांधकामांसाठी वापरली जाते. कायद्याने रस्ते व इतर सुविधांसाठी रिक्त ठेवावयाची जागाही व्यापली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकारचा हा चालढकलपणा असाच सुरू राहिला तर आगामी काळात अभियान व गाव पातळीवरील अन्य संघटना आपली पुढील कृती जाहीर करील, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.

No comments: