Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 29 June, 2010

'लूटमार करण्यासाठीच इंधन दरवाढ'

संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचा पुतळा जाळला
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): कॉंग्रेस सरकारच्या राजवटीत महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. याचे परिणाम सामान्य जनतेला येत्या दोन महिन्यांत दिसून येतील. केवळ लूटमार करण्यासाठीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि गॅसच्या किमती वाढवलेल्या आहेत, अशी टीका करून हे वाढीव दर त्वरित मागे घेण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. भारतीय जनता पक्षातर्फे आज पणजी महागाई विरोधात लाक्षणिक आंदोलन करून कॉंग्रेसचा पुतळा जाळण्यात आला.
केंद्र सरकारची आर्थिक नीती ही पूर्णपणे चुकीची आहे. १९७५ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती, त्याच प्रकारची आर्थिक आणीबाणी सध्या कॉंग्रेस लादू पाहत आहे. धान्य सरकारच्या गोदामात कुजत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या असतानाही केंद्र सरकार पेट्रोलवर लूट मारीत आहे. कच्च्या तेलाच्या किमती पाहिल्यास भारतात पेट्रोल २८ रुपयांनी मिळायला पाहिजे. मात्र ते पेट्रोल हे सरकार ५३ रुपयांनी उपलब्ध करीत असल्याचा आरोप यावेळी श्री. पर्रीकर यांनी केला.
यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. या सरकारला खरी अद्दल घडवायची असेल तर हा विषय गावागावांत सामान्य जनतेपर्यंत पोचवला पाहिजे, असे पर्रीकर यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कॅप्टन ऑफ पोर्टच्या समोरील आवार कॉंग्रेस विरोधी घोषणांनी दणाणून सोडला. "जब जब कॉंग्रेस सरकार आयी है, तब तब महंगाई बढी है' तसेच "जिसकी मम्मी सोनिया है, वो सरकार निकम्मी है' अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर वक्त्यांनी कॉंग्रेसच्या धोरणाविरोधात भाषणे करून रस्त्याच्या मधोमध कॉंग्रेसचा पुतळा जाळला. कॉंग्रेस सरकार हे दहशतवादी आहे. जगातील सर्व वाईट विशेषणे त्यांना लागू होत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. ते पुढे बोलताना म्हणाले, हे सरकार "कमिशन एजंट' वाल्याचे आहे. त्यांना मातीमोल करायचे असल्यास येत्या निवडणुकीत जनतेने जागृतपणे मतदान करण्याची गरज आहे.
कॉंग्रेस सरकारने देशातील लोकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शंभर दिवसात महागाई आटोक्यात आणण्यास अपयश आले आहे. या महागाईला कॉंग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी जबाबदार असल्याची टीका शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी केली. देशातील ७० टक्के जनता ही सामान्य आहे. त्यांची पिळवणूक करून कोणाचे खिसे भरण्यासाठी ही महागाई वाढवली आहे, असा सवाल यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केला. "आम आदमी'चे सरकार म्हणून बोंबलणारे हे सरकार जनतेला स्वतः काहीच देऊ शकत नाही. त्यामुळे कॉंग्रेस सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणतेही अधिकार नाही, असे मत यावेळी भाजपच्या महिला नेत्या कुंदा चोडणकर यांनी व्यक्त केले. टीशर्ट आणि एक हजारांच्या नोटा देऊन हे कॉंग्रेसचे सरकार निवडून आले आहे अशी टीका करून सेल्फहेल्प ग्रुपना २५ हजार रुपये देण्यासाठी येणाऱ्यांपासून महिलांनी सावध राहावे, असे आवाहन यावेळी सौ. चोडणकर यांनी केले. महागाई हा एक महाघोटाळा असल्याची टीका आमदार अनंत शेट यांनी केली. तर झोपेचे सोंग घेतलेल्या या लुटारू सरकारला घरी पाठवण्याची गरज असल्याचे मत नगरसेविका सौ. वैदेही नाईक यांनी व्यक्त केले. या महागाईत साधी झाडू ही ६५ रुपये झाली आहे. या झाडूनेच या सरकारला झाडून काढले पाहिजे, असे सौ. शुभदा सावईकर म्हणाल्या. यावेळी जिल्हा पंच सदस्य सौ. शिल्पा नाईक, सिद्धेश नाईक, जिल्हा पंच सदस्य दीपक कळंगुटकर यांनीही कॉंग्रेस सरकारवर जोरदार टीका केली.

No comments: