रालोआ, डाव्यांसह विरोधकांची हाक
नवी दिल्ली, दि. २९ : पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि केरोसिन या पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये वाढ करून आधीच महागाईने हैराण असलेल्या जनतेला महागाईच्या गरम ताव्यावर उभे करून चटके देण्याच्या केंद्रातील संपुआ सरकारच्या घातकी निर्णयाचा निषेध करण्यासाठी तसेच सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला भाग पाडण्यासाठी ५ जुलै रोजी "भारत बंद' पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआ तसेच माकपाच्या नेतृत्वातील डाव्या पक्षांसह संपूर्ण विरोधी पक्ष या मुद्यावर एकत्रित झाले असून त्यांनीच ही "भारत बंद'ची हाक दिली आहे.
पेट्रोलियम दरवाढ मागे घेण्यासाठी ५ जुलै रोजी "भारत बंद' पुकारण्याची रालोआ आणि डाव्या पक्षांनी वेगवेगळी घोषणा केली.
""यापूर्वी ७० च्या दशकातील मध्यान्हात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला अभूतपूर्व असा देशव्यापी पाठिंबा मिळाला होता. रालोआ आणि डाव्या पक्षांनी ५ जुलै रोजी "भारत बंद' पुकारण्याची हाक देऊन त्यावेळच्या आंदोलनाच्या स्मृती जागविल्या आहेत,''अशी प्रतिक्रिया रालोआचे संयोजक व संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी आज व्यक्त केली.
""पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावर विरोधी पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. सर्वच विरोधी पक्षांमध्ये या मुद्यावर मतैक्य आहे. प्रत्येक विरोधी पक्षांनी या दरवाढीचा निषेध केला असून ही दरवाढ मागे घेतली गेलीच पाहिजे, अशी मागणी केलेली आहे,''अशी माहिती शरद यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ५ जुलै रोजी १२ तासांचा "भारत बंद' पुकारण्याची घोषणा डावे पक्ष तसेच गैरभाजपा विरोधी पक्षांनी केल्यानंतर रालोआनेही ५ जुलै रोजी १२ तासांचा "भारत बंद' पुकारण्याची वेगळी घोषणा केली.
पाणी, दूध, वीज,आरोग्य यासारख्या अत्यावश्यक सेवांसह आणिबाणीच्या सेवांनाही या बंदमधून वगळण्यात आलेले आहे, असेही शरद यादव यांनी सांगितले.
"दाम रोको या गद्दी छोडो...हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सबके घर मे है महंगाई, असे नारे या आंदोलनात दिले जाणार आहे. चार पक्षांच्या डाव्या आघाडीशिवाय अण्णाद्रमुक, तेदेपा, समाजवादी पार्टी, बिजू जनता दल, जेडीएस आणि इंडियन नॅशनल लोकदल यांनीही ५ जुलै रोजीच्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे.
बंदमध्ये सहभागी व्हा : गडकरी
"आधीच महागाईने जनता पोळली जात असताना पेट्रोलियम दरवाढ करण्याचा संपुआ सरकारचा निर्णय असमर्थनीय आहे. महागाईचा प्रश्न उग्र असताना पेट्रोलियम दरवाढ करून सरकारने महागाईचा भडका उडविलेला आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व ही दरवाढ सरकारला मागे घ्यायला भाग पाडण्यासाठी ५ जुलै रोजी "देशव्यापी बंद' पुकारण्याची हाक भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलेली आहे,''असे भाजपाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
डाव्यांसह सर्व विरोधी पक्षांना या मुद्यावर एकत्रित आणण्यासाठी शरद यादव यांनी पुढाकार घेतला असून, गैररालोआ पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्यास आंदोलन अधिक प्रभावी होईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
""५ जुलै रोजीच्या "भारत बंद' आंदोलनात देशभरातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,''असे आवाहन भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले आहे.
Wednesday 30 June, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment