Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 29 June, 2010

भाजप-जद(यु)त सारे काही 'आलबेल'

-जागावाटपावर अखेर सहमती
-जुनेच समीकरण चालविणार

नवी दिल्ली, दि. २८ : बऱ्याच वाद-विवादानंतर अखेर भाजपा आणि जद(यु) यांच्यातील समझोता गाडी रूळावर आली आणि दोन्ही पक्षांनी आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाच्या मुद्यावर सहमतीने निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. दोन्ही पक्षांनी २००५ चा "फॉर्म्युला'च आधारभूत मानण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
बिहारमध्ये २४३ सदस्यीय विधानसभेसाठी २००५ मध्ये जदयूने १३९ तर भाजपाने १०२ जागांवर निवडणूक लढविली होती. उर्वरित दोन जागांसाठी दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेदवारांना स्थान दिले. यावेळी दोन्ही पक्षांचे नेमके कुठे एकमत होईल, किंबहुना ते होईल की नाही, अशा अफवा पसरविल्या जात होत्या. पण, मागील आठवड्यात भाजपाध्यक्ष नितीन गडकरी आणि वरिष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी जदयुचे प्रमुख शरद यादव यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण निकालात काढल्याच समजते. या भेटीचे फलित म्हणूनच दोन्ही पक्षांनी जुन्याच फॉर्म्युल्याने आगामी निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता ही युती निवडणूक लढविणार आहे.
अद्याप राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. पण, बिहार विधानसभेची मुदत येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपते आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No comments: