'बेमुर्वतखोर कॉंग्रेसला सामान्यांबद्दल ना खंत ना खेद'
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): महागाईमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सामान्य लोकांचे आता इंधन दरवाढीमुळे कंबरडेच मोडले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात दोनदा इंधन दरवाढ करून केंद्रातील कॉंग्रेस सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणेच कठीण करून ठेवले आहे. "आम आदमी' चा या सरकारचा असलेला पुळका हा किती दिखाऊ आहे हेच यावरून उघड होते, अशी कडकडीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. इंधन दरवाढीच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी प्रदेश भाजपतर्फे सोमवार २८ रोजी बंदर कप्तान कार्यालयासमोर निदर्शने कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.
आज इथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत प्रा.पार्सेकर यांनी ही माहिती दिली.पेट्रोल व डिझेलच्या किंमती ठरवण्यावरील सरकारने आपले नियंत्रणही काढून टाकले आहे. केवळ तेल कंपन्यांच्या नुकसानीची चिंता या सरकारला लागून राहिली आहे; पण या दरवाढीचा भडका कोट्यवधी देशवासीयांना जाणवेल याचे सोयरसुतक कॉंग्रेस सरकारला अजिबात नाही, असा टोलाही प्रा.पार्सेकर यांनी हाणला.
दरवाढ करून वर ही कळ जनता सोसेल,अशी मल्लिनाथी करून जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचा सरकारचा हा प्रयत्न म्हणजे अमानुषपणाचा कळस आहे,अशी टीकाही यावेळी प्रा.पार्सेकर यांनी केली. इंधन दरवाढीच्या या निर्णयाला विरोध करून भाजपतर्फे देशव्यापी रणशिंग फुंकले आहे.या आंदोलनाचा भाग म्हणूनच सोमवार २८ रोजी पणजीत निदर्शने कार्यक्रम होतील.संध्याकाळी ३ ते ५.३० या दरम्यान बंदर कप्तान कार्यालयासमोर होणाऱ्या या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते, हितचिंतक व सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावावी व या निर्णयाला कडाडून विरोध करावा,असे आवाहनही यावेळी प्रा.पार्सेकर यांनी केले.
Sunday 27 June, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment