Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 June, 2010

छोट्या उद्योगाकडे पूर्ण दुर्लक्ष

सुतेज साकोर्डेकर
गुडी-पारोडा

आमच्या गोवा राज्याचा कारभार म्हणजे नियंत्रण सुटलेल्या गाडीसारखा आहे, त्यामुळे गोव्याच्या विकासाची गाडी प्रगतीकडे जात आहे की अधोेगतीकडे जात आहे, याचे जराही भान राज्याच्या मंत्री,आमदारांना नाही.
वास्तविक गोव्याचा विकास हा पंचायत व नगरपालिका कायदा कलम ७३ व ७४ नुसार होणे आवश्यक होते, पण ही कलमे या राजकारण्यांनी धाब्यावर बसवून स्वहिताला पोषक ठरतील असेच प्रकल्प विकासाच्या नावाखाली गोव्यात आणून गोव्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ केला आहे. हे व अशा प्रकारचे मत सध्या कुंकळ्ळीत व उर्वरित गोव्यात सुद्धा प्रतिष्ठित व्यक्तींकडून व्यक्त केले जात असून या बेकायदा कारवायांना कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे, असेही बोलले जात आहे.
जनतेचा विरोध डावलून बेतुल येथे स्थापन होत असलेली औद्योगिक वसाहत किंवा कुंकळ्ळीत उभे राहिलेले करोडो रुपयांचे भव्य प्रकल्प हे याची उत्तम उदाहरणे असून असे प्रकल्प बिनबोभाटपणे राज्यात उभे राहावेत म्हणून या राजकारण्यांनी आपल्या मतदारसंघातील तमाम पंचायती व नगरपालिकांवर आपले वर्चस्व निर्माण केलेले आहे व आपल्या मर्जीशिवाय एक पानही हलणार नाही, याची चोख व्यवस्था केली आहे.
याविषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बेतुल येथील समाजकार्यकर्ते प्रभाकर जोशी म्हणाले की इथली औद्योगिक वसाहत बेतुलवासीयांचे हित नजरेसमोर ठेवून आणलेली नाही. कारण इथल्या उद्योगात काम करू शकणारे मनुष्यबळ बेतुल परिसरात उपलब्ध नाही. याऐवजी इथे लहानलहान कुटीरोद्योग स्थापन केले असते तर इथल्या प्रत्येक घराला व घरातील प्रत्येकाला काम मिळाले असते. कुंकळ्ळी येथील विकासकामावर बोलताना एक नोकरदार महिला श्रीमती लोर्नामोराईस म्हणाल्या की, कुंकळ्ळीचा झपाट्याने विकास होत आहे. इथे बहुउद्देशीय प्रकल्प, भव्य बाजारसंकुल तसेच विशेष बाजारासारखे प्रकल्प साकारले आहेत. हे प्रकल्प भले बेतुल औद्योगिक वसाहतीसारखे परराज्यातील कामगारांची भरती करणारे नसतीलही तरीपण हे प्रकल्प सामान्यांचे हित पाहणारे आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उदाहरणार्थ इथे उभे राहणारे विशेष बाजार संकुल ज्यांत आधुनिक नाट्यगृह, फार्मसी, बॅंकेसारखी आस्थापने येणार आहेत, ज्यातून सामान्य माणसांचा रोजीरोटीचा प्रश्न थोडाच सुटणार आहे. उलट हे सर्व प्रकल्प एकाच ठिकाणी एकवटल्यामुळे पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मियाचा ढळढळीत पुरावा म्हणजे रविवारी सकाळी पार्किंगमुळे होत असलेली वाहनांची कोंडी. याउलट देमानी, गवळेकट्टा वेरोडा, मुरीडा अशा ठिकाणी लहान पूरक बाजार संकुल उभारून आजच्या बाजार संकुलाचे विकेंद्रीकरण केले असते तर एकट्या कुंकळ्ळी बाजारावर पडणारा ताण व पार्किंगची कोंडी सहज सुटली असती. तसेच आजूबाजूच्या गावातील लहान लहान कृषी व्यवसाय करणाऱ्या लहान शेतकऱ्यांना त्या-त्या ठिकाणी व्यवसाय करण्यास वाव मिळाला असता.
याउलट यावर तोडगा सांगताना कुंकळ्ळी मार्केटमधील एक व्यावसायिक दयानंद सावंत म्हणाले की, गोव्याची आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी मोठे उद्योग गोव्यात येणे आवश्यक आहे. मात्र ते गोव्यातील उपलब्ध मनुष्यबळावर आधारित हवेत. त्याचबरोबर सरकारतर्फे ग्रामोद्योगास प्रोत्साहन देत असे लहान व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात आणल्यास तमाम जनतेला त्याचा फायदा होणार मात्र, असे उद्योग आपल्या विकासात आणण्यासाठी तमाम राजकीय नेतृत्वाने आपले हट्ट बाजूला ठेवून सर्व स्वराज संस्थांनी मुक्त हस्ते देत मोकळ्या मनाने आपले कार्य करण्यास मोकळीक देणे आवश्यक आहे.

No comments: