Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 June, 2010

वेर्ला-काणका येथे चिरेखाणीत दोन शालेय मुलांचा बुडून मृत्यू

म्हापसा, दि. २७ (प्रतिनिधी)- वेर्ला काणका येथे पावसाच्या पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत पोहायला गेलेल्या दोन मुलांना आज बुडून मरण आले. दुर्दैवी अंत झालेले खोर्ली-सांतीगण येथील फय्याज (१२ वर्षे) व यासीन (९ वर्षे) हे दोघेही भाऊ आहेत.
आज दुपारी सुमारे एक वाजता वेर्ला-काणका येथील पाण्याने भरलेल्या चिरेखाणीकडून तीन बालक आपले मित्र बुडाल्याची आक्रोश करीत रस्त्यावरून धावताना दिसले. स्थानिक लोकांनी त्यांना नेमके काय व कुठे घडले असे विचारले असता, घाबरून त्यांनी काहीच न सांगता पळ काढला. या प्रकारामुळे स्थानिकांनी वर डोंगरी भागाकडे धाव घेतली असता एका चिरेखाणीजवळ त्यांना कपडे व चप्पल दिसली. आत कोणी बुडाले आहे का, याचा शोध घेण्यासाठी काही जणांनी त्या खाणीत उतरून पाहणी केली, पण काहीच मिळू शकले नाही. याचवेळी काही जणांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. या दलाच्या जवानांनी खाणीच्या तळाशी जाऊन शोध घेतला असता, दोन मुले चिखलात रुतल्याचे त्यांना आढळले. जवानांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले व पोलिसांना याबाबत माहिती दिली. दोन्ही मुले अनोळखी असल्याने त्यांची नावे पोलिसांना मिळाली नाहीत, तथापि ती काणका येथील असल्याची माहिती मिळताच, त्यांची ओळख पटविणे शक्य झाले. रिक्षाचालक मेहबूब खान तेथे आला, त्यावेळी दोन्ही मुले आपलीच असल्याचे सांगून त्याने टाहो फोडला. उपनिरीक्षक तुळशीदास धावस्कर यांनी पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथे विच्छेदनासाठी पाठविले. खाणीत बुडून मुलांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच म्हापशातील अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या शालेय मुलांच्या अकाली मृत्यूबद्दल या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज रविवार असल्याने ही मुले त्या भागात फिरावयास गेली असावी, असा अंदाज आहे. तरीही घरी कल्पना न देता एवढ्या दूर ती का व कशी गेली, याबद्दल चर्चा होत आहे.

चिरेखाणी ठरल्या मृत्यूचे सापळे?
बंद अवस्थेत असलेली वेर्ला-काणका येथील ही खाण गेल्या ३० वर्षापासून तशीच आहे. यापूर्वी याच चिरेखाणीत तिघांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यात पेडणे, सांगे, बार्देश, फोंडा आदी तालुक्यांत अशा खाणी अस्तित्वात असून, चिरे काढल्यानंतर त्या तशाच अवस्थेत राहू दिल्या जात असल्याने मृत्यूचे सापळे ठरले आहेत. या खणी बुजविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर टाकण्याऐवजी त्या तशाच अवस्थेत टाकल्या जात असल्याने त्या धोकादायक ठरल्या आहेत. यासंबंधी कोणतीच कारवाई केली जात नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे.

No comments: