Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 2 July, 2010

सुरेंद्र शेटये खोर्ली-म्हापसा

पाण्याशी खेळ कराल तर गाठ मृत्यूशी
विसंगत वागणाऱ्या पाण्याने स्वतःला "जीवन' म्हणवून घेताना किती जणांचे प्राण घेतले याला सुमारच नाही. फेसाळणाऱ्या लाटांचा समुद्र असो वा कडेकपाऱ्यातून कोसळणारा जलप्रवाह असो, नागमोडी वळणं घेत दुथडी भरुन वाहणारी नदी असो वा साठलेल्या पाण्याचे जलाशय असोत. गटांगळ्या खात मृत्यूच्या दाढेत जलसमाधी मिळून होत्याचे नव्हते झालेले कैक मृत्यू गणती करावी तेवढे थोडेच. कुणीही सहजतेने पाण्याकडे ओढला जातो अन् खोलीचा अथवा प्रवाहाच्या जोराचा अंदाज न आल्याने प्राणास मुकतो. यात प्रामुख्याने पर्यटकांचा समावेश करावा लागेल. समुद्रस्नानावेळी ही मंडळी अथांग सागरात ओढली जाऊन परत कधीच न येण्यासाठी कायमची दूर निघून जातात. तसेच बालवयातली मुले पाण्याशी खेळ करून नुकत्याच उमलू पाहणाऱ्या जीवनाची इतिश्री करतात. अर्थात, सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या
स्वीमिंग पूलमध्ये असे आक्रित घडू शकते. तेथे निष्काळजीपणा भोवतो. मात्र निर्जन ठिकाणी विहीरीत वगैरे पोहायला जाताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अपघाती मृत्यू होऊ शकतात.
२७ जूनला घडलेले दोघा लहानग्यांचे मृत्यू हे असेच निष्काळजीपणामुळे घडले. मोठ्यांच्या सोबतीशिवाय दहा बारा वर्षाच्या मुलांनी एकट्याने पाण्यात उतरण्याची आगळीक करायला नको होती.
वेर्ला-काणका येथे दोन भावांचे झालेेले मृत्यू चटका लावून गेले. फैयाज आणि यासीन शेख अशी नावे असलेले हे दोन युवक पावसाळी पोहण्याची मजा लुटण्यासाठी म्हणून वेर्ला काणका येथे पोहण्यासाठी जातात काय आणि एक दुसऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात स्वतःचे प्राण गमावून बसतात. सारेच वेदनादायी. त्यांचा तिसरा भाऊ विकलांग. काय हे दुर्दैवाचे दशावतार? आई-वडिलांवर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराची कल्पनाच करवत नाही. सगळे कल्पनेपलीकडचे.
पाण्याशी अन्‌ आगीशी खेळू नये म्हणतात ते याचसाठी. पाण्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही. ५ जुलैला मुंबईवासीयांनी पावसाचा असाच कहर अनुभवला होता. रेल्वे ठप्प, गाड्या ठप्प. पाणीच पाणी चोहीकडे. डबलडेकरच्या छतावरसुद्धा रात काढायला लागावी. तो जलप्रलय आठवला की आजही अंगावर सरसरून काटा येतो.
पाण्यातले मुत्यूचे तांडव नजरेपुढे तरळायला लागले की, पाण्यातल्या मौजमजेची मनस्वी चीड येते. तशात दारू झोकून पाण्यात मस्ती करणे
महाग पडू शकते. किनाऱ्यावर धोक्याचे बावटे लावूनसुद्धा अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत नाही. गळाभर पाण्यात पोहताना जलसमाधी कधीही मिळू शकते याचे भान पोहणाऱ्या प्रत्येकाने ठेवले पाहिजे. आजकाल किनाऱ्यावर जीवरक्षकही नियुक्त करण्यात आले आहेत. सरकारी पातळीवरून असे अपघाती मृत्यू रोेखायचे प्रयत्न केले जातात, मात्र स्वतःच्या जीवाचे भय प्रत्येकानेच राखायला हवे. म्हापशाच्या खोर्ली भागातील घडलेल्या ह्या दोन मुलांच्या मृत्युची घटना ही नुसती हळहळ वाटून विसरता येण्याजोगी नाही.
पोहायला जाणाऱ्या सर्व मुलांना शाळांमार्फत तसेच घरात वडिलधाऱ्यांकडून धोक्याचे कंदील दाखवायलाच हवेत. खोर्ली भागात सातेरी देवळामागच्या झरीवर अशीच मुले सदासर्वकाळ पोहताना आढळून येतात. कुणी नवशिका अजाणतेपणी मृत्यूच्या खाईत जाऊ शकतो. यापूर्वीही तेथे अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत.
आसपासच्या लोकांनी त्या मुलांना वेळीच सावध करणे गरजेचे आहे. अशी जागृती झाली तरच फैयाज व यासीनचे मृत्यू तरी बाकीच्यांना सजग करण्यास यशस्वी ठरतील.

No comments: