Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 June, 2010

प्रवासी दरवाढीची मागणी मान्य न झाल्यास ५ रोजी वाहतूक बंद

खाजगी बसमालकांचा मंत्र्यांवर रोष

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने डिझेलवर केलेल्या भरमसाठ वाढीवर राज्य सरकारने त्वरित प्रवासी तिकीट दरवाढ द्यावी अन्यथा येत्या ५ जुलै रोजी संपूर्ण राज्यात खाजगी बस वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने दिला आले. १ ते ३ किलोमीटर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरवर २० पैसे वाढ देण्याची मागणी बस मालकांनी केली आहे. इंधनाच्या दरवाढीपूर्वी हीच मागणी करण्यात आली होती, त्याकडेही दुर्लक्ष केलेल्या तसेच प्रवाशांची आणि वाहतूकदारांची किंमत नसलेल्या वाहतूक मंत्र्यांना त्वरित मंत्रिपदावरून काढून टाकण्याची मागणीही आज पणजी घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी राज्यभरातून सुमारे दीडशे खाजगी प्रवासी बसमालक उपस्थित होते.
गेल्यावेळी तिकीट दरवाढीवरून वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा देताच वाहतूक खात्याचे संचालक स्वप्निल नाईक यांनी बोलावून तिकीट वाढ देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली होती. त्यामुळे दि. २५ जून रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने गेल्या पंधरा दिवसांत आमच्या मागण्यांवर कोणताही निर्णय घेतला नाही. उलट स्वप्निल नाईक यांची बदली करून त्यांच्या जागी संदीप जॅकीस यांची नेमणूक केली. श्री. जॅकीस यांनी अद्याप संचालकपदाचा ताबा घेतलेला नाही अथवा आमच्या मागण्यांवरही तोडगा काढलेला नाही. एक प्रकारे वाहतूक खात्याने खाजगी बसमालकांची कुचेष्टा केली असल्याचा आरोप यावेळी संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केला. यावेळी अनेक बसमालकांनी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर व वाहतूक खात्यावर आगपाखड केली.
दि. २६ डिसेंबर २००८ मध्ये तिकीटवाढ देण्यात आली होती. त्यावेळी डिझेल ३५.३३ रुपये लीटर होते. या दोन वर्षात डिझेलवर ४ रुपये २७ पैसे वाढले असून आज डिझेल ४०.२७ रुपये लीटर झाले आहे. त्यामुळे वाहतुकीचे दर वाढले असून बसचे सुटे भागांच्या किमती वाढल्या आहेत. बस मालकांना दिलासा मिळण्यासाठी तिकीट वाढ ही मिळालीच पाहिजे आणि ही मागणी रास्त असल्याचे श्री. ताम्हणकर म्हणाले.
खाजगी बस मालक संघटनेतर्फे सरकारला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात पहिल्या तीन किलोमीटरसाठी सध्याचे ५ रुपये तसेच चालू ठेवून पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ०.४५ पैशांऐवजी ०.६५ पैसे वाढ देण्याची मागणी केली होती. आता डिझेलच्या दरांत पुन्हा दोन रुपयांनी वाढ झाल्याने नवा प्रस्ताव त्यात अजून वाढ मागण्याचा प्रस्ताव काही बस मालकांकडून आला होता. परंतु, संघटनेने सध्या हा प्रस्ताव तूर्तास स्थगित ठेवला आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने केवळ २० पैसेच प्रत्येक कि.मी मागे वाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाहतूक मंत्र्यांची अनास्था संतापजनक
वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर हे कोणत्या पक्षाचे आहेत हेच कळण्यास मार्ग नाही, अशी टीका करून त्यांना प्रवाशांचे आणि वाहतूकदारांचेही सोयरसुतक नाही, असा आरोप यावेळी श्री. ताम्हणकर यांनी केला. सरकारने त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून वगळावे, अशीही मागणी यावेळी बस मालकांनी केली. वाहतूक खात्यातील सर्व साहाय्यक वाहतूक संचालक हे "यमदूत' बनले असून मंत्री हे त्यांचे "राजा' असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. सर्व संचालकांनी या मंत्र्यापासून सावध राहावे, अशी सूचनाही यावेळी श्री. ताम्हणकर यांनी केली आहे. तसेच, राज्यातील कोणी वाहतूक निरीक्षक विनाकारण बसमालकांना सतावत असल्यास त्यांची तक्रार संघटनेकडे करावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

No comments: