Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 24 May, 2010

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने महिला संघटना खवळल्या

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- "राजकारणात महिला आल्यास समाजावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे', या मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यावर महिला संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिला राजकारणात आल्यास पुरुष राजकीय नेत्यांची शक्ती कमी होत असल्यानेच त्यांना महिला आमदार बनू नये, असे वाटते, अशी टीका "बायलांचो साद' या संघटनेने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल पणजीतील एका महिला मेळाव्यात बोलताना सदर वक्तव्य केले होते.
महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष प्रमोद साळगावकर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. अर्थात, मुख्यमंत्र्यांनी सहज म्हणून ही सूचना केली होती, अशीही सारवासारव त्यांनी केली.
ज्या कॉंग्रेस पक्षाची धुरा एक महिला सांभाळते त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढणे योग्य नसल्याचे "बायलांचो साद'च्या श्रीमती सबिना मार्टिन म्हणाल्या. काल पणजीतील एका महिला मेळाव्यात मुख्यमंत्री कामत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंबंधीच्या विधेयकाबाबतची त्यांनी संदिग्ध भूमिका घेतल्याने त्यांचे भाषण हाच मुळी या मेळाव्यात चर्चेचा विषय बनला होता. महिलांनी ३३ टक्के आरक्षणाच्या आमिषाला बळी पडू नये, राजकारणात माणूस वेड्यासारखा गुंतून जातो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य महिलांत असते व त्यामुळे पुढील पिढी चांगली बनायची असेल तर महिलांनी राजकारणापासून अलिप्त राहणेच उचित ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले होते.

No comments: