Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 28 May, 2010

दहावीचा ८३.५० टक्के विक्रमी निकाल

नंदन पै काकोडे राज्यात पहिला
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च ते एप्रिल महिन्यात २३ केंद्रांतून घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल यंदा ८३.५० टक्के लागला असून गेल्या सात वर्षाच्या तुलनेत ही सर्वांत जास्त टक्केवारी आहे. परीक्षेला बसलेल्या १५ हजार ८०८ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांनी बाजी मारली असून ७९.४१ टक्के विद्यार्थी तर, ७८.२४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचा निकाल जास्त लागला असला तरी विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांत मुलीच पुढे असल्याचे दिसून आले आहे. ९७९ मुली तर, ७१३ मुले विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी राज्यात पहिल्या क्रमांकावर नंदन नागेश पै काकोडे (९५.५० टक्के, महिला नुतन इंग्लिश विद्यालय, मडगाव), दुसऱ्या क्रमांकावर नेहा दरोचा (९५.१६ टक्के, दोना लियोनोर्र माध्य. विद्यालय, पर्वरी), तिसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या उगम उजगावकर (९४.६६ टक्के मुष्टिफंड माध्यमिक विद्यालय, पणजी) यांनी बाजी मारली आहे. २००४ साली ६३.५३ टक्के, २००५ मध्ये ५९ टक्के, २००६ साली ६९.५१ टक्के, २००७ मध्ये ७३.६३ टक्के, २००८ साली ६९.९४ टक्के तर, २००९ साली ७७.११ टक्के निकाल लागला होता. या परीक्षेत वीस विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला, तर दोन विद्यालयांचा शून्य टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेला १५,८२४ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेल्यांपैकी एकूण १५,८०८ विद्यार्थी बसले होते. त्यातील १३,२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या ९ हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८ हजार ७२६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. फेरपरीक्षेला बसलेल्या १ हजार ९८४ विद्यार्थ्यांपैकी ८२६ जण उत्तीर्ण झाले आहेत. फेरपरीक्षेचा निकाल ४१.६३ टक्के लागला आहे.
उत्तर पत्रिकेच्या फोटो प्रतीसाठी शेवटची मुदत २४ जून आहे, तर फेरतपासणीसाठी लागणारा विनंती अर्ज शालान्त मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थी तो तेथून डाऊनलोड करून घेऊ शकतात. मात्र तो अर्ज विद्यालयाच्या प्रमुखांच्या सहीसह पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयात द्यावा लागणार आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष मॅवरिन डिसोझा यांनी दिली.
दहावीची परीक्षा घेण्यात आलेल्या २३ केंद्रांमध्ये फोंडा केंद्राने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर पर्वरी केंद्र आहे. फोंडा केंद्राचा ९१.६६ टक्के निकाल लागला आहे. तर, पर्वरी ९०.३२ टक्के निकाल लागला आहे. तसेच पणजी ८५.६३, मडगाव ८५.२३, म्हापसा ८६.६७, वास्को ८५.५०, डिचोली ८१.९१, काणकोण ७२,४, कुंकळ्ळी ७५.१४, कुडचडे ८१.९३, केपे ८३.६४, माशेल ८५.११, मंगेशी ८५.५५, पेडणे ६७.०९, पिलार ८०.८९, सांगे ७९.६७, साखळी ७६.८८, शिरोडा ७०.९०, शिवोली ७९.६२, तिस्क धारबांदोडा ७०.६६, वाळपई ७१.४७, नावेली ९३.०१, तर मांद्रे केंद्राचा ७८.९३ टक्के निकाल लागला.
-----------------------------------------------------------
या वर्षापासून श्रेणी पद्धती...
२०११ सालापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी पद्धती लागू केली जाणार आहे. त्यामुळे "डिस्टिंक्शन',"फर्स्ट क्लास', "सेकंड क्लास' असे वर्ग नसतील. याविषयीची मान्यता राज्य सरकारने दिली असून दोन दिवसांपूर्वीच या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे श्री. डिसोझा यांनी सांगितले. "ए' ते "आय' पर्यंत ही श्रेणी असणार आहे. "ए' ते "जी' पर्यंत श्रेणी मिळवणारे विद्यार्थीच उत्तीर्ण होणार आहेत तर, उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३० टक्के गूण मिळवणे गरजेचे आहे. यापूर्वी उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गूण मिळणे महत्त्वाचे होते. तसेच, विद्यालयात होणाऱ्या परीक्षा विद्यार्थी गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात आल्यानेही त्या परीक्षांचे गुण तसेच, विविध प्रकल्प व उपक्रमाचे असे २० टक्के गूण अंतिम परीक्षेत ग्राह्य धरले जाणार आहेत.
--------------------------------
क्रीडा धोरणाचा ११३ विद्यार्थ्यांना लाभ
राज्य सरकारने लागू केलेल्या क्रीडा धोरणाचा ११३ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यात २७ विद्यार्थिनींचाही समावेश आहे.
---------------------------------------
सरकारी विद्यालयांची विशेष कामगिरी...
राज्यातील वीस विद्यालयांनी शंभर टक्के निकाल लावण्याचा मान मिळवला असून त्यांचे मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वीस विद्यालयांमध्ये चक्क सात सरकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे बोरी येथील मतिमंद मुलांसाठी असलेल्या विद्यालयाचाही निकाल शंभर टक्के लागला आहे. याचे श्रेय शालान्त मंडळाने त्या विद्यालयातील शिक्षकांना दिले आहे.
----------------------------------
शून्य टक्के निकाल...
शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यात दोन विद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. चंद्रनाथ एज्युकेशन सोसायटी असोल्डा, चांदर या विद्यालयातील ४ पैकी ३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सेंट ऍन्थनी विद्यालय असोल्णा, सासष्टी या विद्यालयातील ९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील एकाच विद्यार्थ्याला "एटीकेटी' मिळाली.
------------------------------------------------
शंभर टक्के निकाल लागलेली विद्यालये...
शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय, खोलपावाडी साळ
सरकारी माध्यमिक विद्यालय, गवळ- खोला, काणकोण
सेंट तेरेझा माध्यमिक विद्यालय, वास्को
लोकमान्य टिळक विद्यालय, कवळे-फोंडा
सेंट मेरी माध्यमिक विद्यालय, फोंडा
डॉ. सखाराम गुडे विद्यालय, वजनगाळ शिरोडा
सरकारी माध्यमिक विद्यालय, गांजे -उजगाव
श्री नवदुर्गा एज्युकेशन व कल्चरल सोसायटी विद्यालय
लोकविश्वास प्रतिष्ठान मिडल विद्यालय ढवळी, फोंडा
सरकारी माध्यमिक विद्यालय, शेल्डे केपे
सरकारी माध्यमिक विद्यालय मायणा, केपे
सरकारी माध्यमिक विद्यालय आंबावली, केपे
फातिमा कॉन्व्हेंट माध्य. विद्यालय, मडगाव
श्री दामोदर विद्यालय, मडगाव
प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, मडगाव
अवर लेडी ऑफ सुकूर माध्यमिक विद्यालय, वेर्णा मडगाव
असुमप्ता कॉन्व्हेंट माध्य. विद्यालय, सारझोर- चिंचीणी सासष्टी
सरकारी माध्य. विद्यालय नेत्रावळी, सांगे
सरकारी माध्य. विद्यालय, शेळप- सत्तरी
अवर लेडी ऑफ रोझरी विद्यालय करंझाळे, दोनापावला
------------------------------------------
दोन विषयात नापास विद्यार्थ्यांना 'एटीकेटी'
या वर्षीपासून पहिल्यांदाच दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना "एटीकेटी' देण्यात आली आहे. त्यामुळे दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे. परंतु, त्यांना ऑक्टोबर किंवा मार्च महिन्यात त्या दोन विषयांत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. एका विषयात नापास झालेल्या ४२७ विद्यार्थ्यांना "एटीकेटी' तर दोन विषयांत नापास झालेल्या ५८६ विद्यार्थ्यांना "एटीकेटी'चा लाभ मिळाला आहे.

No comments: