Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 24 May, 2010

विमान अपघात : अहलुवालिया, तेजलचा मृतदेह मुंबईत आणले

मुंबई, दि. २३ - एअर इंडियाच्या विमानाला काल मंगलोर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेले विमानाचे सहवैमानिक एच. एस. अहलुवालिया आणि हवाई सुंदरी तेजल कामूलकर या दोघांचे मृतदेह आज दुपारी मुंबईत आणण्यात आले.
अहलुवालियांचे निवासस्थान अंधेरी येेथे आहे, तर तेजल कामूरकर ही ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे राहात होती. अंधेरी येथेच राहात असलेली आणि या अपघातात मरण पावलेली हवाई सुंदरी सुजाता सूरवासेचा मृतदेह अद्याप मुंबईत आणण्यात आलेला नाही.
विमानतळावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी ५.३० च्या सुमारास अहलुवालिया आणि सुजाताचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. तेजलने चारच महिन्यांपूर्वी एअर इंडियामध्ये नोकरीला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे अहलुवालिया गेल्या पंधरा वर्षांपासून सहवैमानिक म्हणून कार्यरत होते.
मृतकांच्या निकटवर्तीयांना १० लाखांची अंतरिम भरपाई
मंगलोर, दि. २३ ः काल मंगलोर येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या १२ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशांच्या निकटवर्तीयांना एअर इंडियातर्फे प्रत्येकी दहा लाखांची अंतरिम भरपाई देण्यात येणार आहे. आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेले एअर इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक अरविंद जाधव यांनी येथे एका पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली.
कालच्या दुर्दैवी अपघातात १५८ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. मृतकांच्या निकटवर्तीयांना ही भरपाई ताबडतोब देण्यात येईल, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.
ज्या प्रवाशांंचे वय १२ पेक्षा जास्त होते त्यांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी दहा लाख आणि १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या प्रवाशांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी पाच लाखांची भरपाई देण्यात येईल. याशिवाय अपघातातील जखमींना अंतरिम भरपाई म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान डॉ. मनमोहसिंग आणि राज्यसरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीव्यतिरिक्त ही भरपाई देण्यात येईल, असेही जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. मृतकांना विम्याची रक्कम मिळावी यासाठी एअर इंडिया रिलायन्स आणि इतर सार्वजनिक विमा कंपन्यांच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी सांगितले.
काल झालेल्या अपघाताता मृत्यूमुखी पडलेल्या १५८ जणांपैकी १२८ मृतदेहांची ओळख पटली असून हे सर्व मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. कालच्या अपघाताच्या कारणांबद्दल प्रसार माध्यमांनी विनाकारण तर्कवितर्क करू नये, असे आवाहन जाधव यांनी यावेळी केले. असे केल्याने मृतकांच्या हितास बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. हे विमान आंतरराष्ट्रीय उड्डाणावर होते. त्यामुळे यासंबंधी वेगवेगळे तर्कवितर्क केल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विपरित परिणात होऊ शकतात, असेही जाधव म्हणाले.

No comments: