Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 May, 2010

मंगलोर येथे भीषण विमान अपघातात १५८ जण ठार

मंगलोर, दि. २२ - एअर इंडिया एक्सप्रेस या एअर इंडियाच्या सहविमान कंपनीचे दुबईहून येथे आलेले विमान उतरल्यानंतर धावपट्टीवर न थांबता विमानतळाच्या बाजूच्या दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान १५८ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
आयएक्स-८१२ हे एअर इंडिया एक्सप्रेसचे ७३७-८०० जातीचे बोईंग विमान आज पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास मंगलोर येथील बाजपी विमानतळावरील धावपट्टीवर उतरले. परंतु, उतरल्यानंतर विमान धावपट्टीवर न थांबता नजीकच्या दरीत जाऊन कोसळले. दरीत कोसळल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातग्रस्त दुर्देवी विमानात एकूण १६६ जण होते. त्यापैकी १६० प्रवासी आणि चालक दलाच्या ६ सदस्यांचा समावेश हाता.
"मला मिळालेल्या माहितीप्रमाणे विमानातील १६० जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. काही प्रवाशांना जखमी अवस्थेत नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे', असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदीयुरप्पा यांनी अपघाताबद्दल बंगलोर येथे पत्रकारांना माहिती देताना सांगितले. या अपघातात फक्त ५ ते ६ प्रवाशांचे प्राण वाचले असावे. हे विमान धावपट्टीवर उतरताना हा अपघात झ्राला आणि विमानाने लगेच पेट घेतला, असे कर्नाटकचे गृहमंत्री व्ही. एस. आचार्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हे विमान पाच वर्ष जुने होते. अपघाताच्यावेळी त्या परिसरात दाट धुके पसरले होते. या दुर्देवी अपघातानंतर मंगलोर विमानतळ बंद करण्यात आले आहे. विमान धावपट्टी ओलांडून संरक्षक भिंतीवर जाऊन धडकले आणि त्यानंतर बाजूच्या दरीत कोसळले, असे हवाई वाहतूक़ तज्ज्ञांनी सांगितले आहे. हे विमान धावपट्टीवर उतरत असताना एका टेकडीच्या टोकाला धडकल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिक कॅप्टन झेड. ग्लुसिका यांनी विमानाचे पुन्हा उड्डाण करण्याचा प्रयत्न केला, असेही काही तज्ज्ञानी म्हटले आहे.
विमानाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त समजताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे(सीआयएसएफ) सुमारे १५० जवान, विमानतळावरील उच्च अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अपघातानंतर अवघ्या काही वेळातच मदतकार्य सुरू झाले. मात्र, विमानाला मोठी आग लागलेली असल्याने त्या परिसरात धुर पसरला होता. त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. विमानाला लागलेली आग विझवल्यानंतर त्या परिसरात असलेले दृष्य हृृदयद्रावक होते. जिकडे तिकडे जळालेले मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी जाऊन आपापल्या परीने शक्य तेवढी मदत केली.


त्या ८ जणांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती
एअर इंडियाच्या दुबईहून येथे आलेल्या विमानाला आज पहाटे झालेल्या भीषण अपघातातून ८ प्रवासी चमत्कारिकरित्या बचावले असून, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीची त्यांना खरोखर प्रचिती आली.
विमानाला अपघात झाल्यानंतर या विमानाचे दोन तुकडे झाले. यावेळी काही प्रवाशांनी विमानातून बाहेर उड्या घेतल्या आणि आपला जीव वाचवला. आणखी काही प्रवाशांनी विमानाला आग लागल्यानंतर आगीपासून बचाव करण्यासाठी बाजूच्या खड्ड्यात उड्या मारल्या. विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातून जात असलेल्या ऑटोरिक्षा चालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे प्राण वाचविण्यात मोलाची मदत केली.
"मी अजूनही जिवंत आहे यावर माझा विश्वासच बसत नाही', अशी प्रतिक्रिया या दुर्देवी विमानातून प्रवास करत असलेल्या प्रदीप नावाच्या प्रवाशाने व्यक्त केली. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वी विमानाला हादरे बसले आणि उतरल्यानंतर लगेच दरीत कोसळून त्याचे तुकडे झाले. दरीत कोसळल्यानंतर सगळीकडे धुर पसरला होता आणि अवघ्या दहा मिनिटातच त्याठिकाणी भीषण स्फोट झाला, असेही प्रदीपने सांगितले. इंधनाच्या टाकीपासून विमानाचे दोन तुकडे झाले, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
विमान धावपट्टीवर उतरत असताना त्याचे एक चाक फुटले आणि त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले, असे उमर फारूख या विमानातील आणखी एका प्रवाशाने सांगितले.

No comments: