Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 26 May, 2010

'एअर इंडिया'चे २० हजार कर्मचारी संपावर

१० उड्डाणे रद्द
मुंबई, दि.२५ : एअर इंडियाचा ग्राऊंड स्टाफ अचानक संपावर गेला आहे. त्यात २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असून इंजीनियरिंग स्टाफही सहभागी आहे.
वेतन न मिळाल्यामुळे हे सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. प्रसार माध्यमांशी या विषयावर बोलल्याप्रकरणी एअर इंडियाच्या इंजीनियरिंग स्टाफला "कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली होती. याच्या विरोधात आणि पगारवढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. एअर इंडियाच्या सर्व कर्मचारी संघटनांना व्यवस्थापनाने नोटीस जारी करून आपल्या समस्या प्रसार माध्यमांसमोर आणू नये, असे सांगितले होते. तसेच मे महिन्याचे वेतनही उशिरा देण्यात आले. वेतनेतर मागण्यांनाही व्यवस्थापनाने नकारघंटा दिली होती. या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी १५ मे रोजी संपाची नोटीस व्यवस्थापनाला दिली होती. पण, त्यात ३१ मेपासून संपावर जाणार असल्याचे नमूद होते. संघटना मात्र तत्पूर्वीच संपावर गेल्या आहेत. हा संप अनिश्चितकालीन असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.
एअर इंडियाचे देशाबाहेरील कर्मचारी यात सहभागी झालेले नाही. आपल्या विविध मागण्यांसाठी एअर इंडियाचा ग्राऊंड तसेच क्रु स्टाफ संपावर गेला आहे.
अर्थात, या संपाचा एअर इंडियाच्या विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
१० उड्डाणे रद्द
एअर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या संपाचा हवाई वाहतूकीवर परिणाम होणार नाही, हा व्यवस्थापनाचा दावा फोल ठरला असून त्यांना लगेचच १० उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
कोलकाता आणि मुंबईच्या प्रत्येकी तीन आणि दिल्लीच्या चार उड्डाणांना रद्द करण्यात आले आहे. अभियंते आणि अन्य कर्मचारी संपावर असल्याने व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागला. या स्थितीचा आढावा घेऊन संपावर तोडगा काढण्यासाठी नागरी उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी एअर इंडियाचे सीएमडी अरविंद जाधव यांची भेट घेतली.

No comments: