रांची, दि. २४ : झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत गेल्या महिनाभरापासून निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या नाट्यावर पडदा टाकत आज अखेर भारतीय जनता पक्षाने शिबू सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे झारखंडमधील"गुरुजीं'चे सरकार अल्पमतात आले आहे. पाठिंबा काढल्यानंतर नवीन सरकार स्थापन होईस्तोवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपा नेते आणि झारखंडचे उपमुख्यमंत्री रघुवीरदास यांनी आज राज्यपाल एम. ओ. एच. फारूक यांची राजभवन येथे भेट घेतली आणि सोरेन सरकारचा पाठिंबा मागे घेत असल्याचे अधिकृत पत्र त्यांना दिलेे.
"" पाठिंबा मागे घेण्याबाबतचे पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी आमदारांच्या स्वाक्षऱ्यांबाबत माझ्याकडे विचारणा केली. उद्यापर्यंत मी सगळ्या आमदारांच्या सह्या घेऊन तसे पत्र आपणाकडे सादर करतो, असे मी राज्यपाल महोदयांना सांगितले आहे,'' अशी माहिती रघुवीर दास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
"भाजपाने सादर केलेल्या पत्राचा अभ्यास केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल,' असे राजभवनच्या सूूूत्रांनी नंतर सांगितले. झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत झारखंड मुक्ती मोर्चाबरोबर भाजपाने एक करार केला होता. त्यानुसार, झामुमोने भाजपाच्या नेतृत्वातील सरकारला विनाअट पाठिंबा देण्याचे घोषित केले होते. परंतु याबाबत मुख्यमंत्री रोज वेगवेगळी विधाने करीत होते. कधी मीच मुख्यमंत्रिपदी कायम राहाणार, आमच्यात आळीपाळीने मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय झाला आहे, केंद्रीय मंत्रिपदाचा प्रस्ताव माझ्याकडे प्रलंबित आहे, तर कधी मी कॉंगे्रसच्या संपर्कात आहे, अशी वेगवेगळी संभ्रम निर्माण करणारी उलटसुलट विधाने शिबू सोरेन करत होते. कालही त्यांनी अशाचप्रकारचे विधान केल्यानंतर अखेर शिबू सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय भाजपाने घेतला आणि आज त्याची अंमलबजावणी केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रालोआने मांडलेल्या कपात प्रस्तावावर झालेल्या मतदानाच्यावेळी शिबू सोरेन यांनी संपुआच्या बाजूने मतदान केल्यानंतर नाराज झालेल्या भाजपाने शिबू सोरेन सरकारचा पाठिंबा काढण्याची घोषणा केली होती. परंतु, झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना एक पत्र लिहून झामुमो राज्यात भाजपा सरकारला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाजपाने शिबू सोरेन यांना पायउतार होण्यासाठी २५ मेपर्यंतची मुदत दिली होती. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे भाजपाने आज त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढला.
Tuesday 25 May, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment