Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 May, 2010

राजकीय कार्यक्रमांपासून आधी पत्नीला दूर ठेवा

भाजप महिला मोर्चाचा मुख्यमंत्र्यांना 'सल्ला'
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): महिलांनी राजकारणापासून अलिप्त राहावे, असा सल्ला देणाऱ्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला राजकीय कार्यक्रमांपासून अलिप्त ठेवावे व मगच आम महिलांना सल्ला द्यावा, असा टोमणा भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने हाणला आहे. हे वादग्रस्त वक्तव्य करण्यापूर्वी कामत यांनी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची संमती घेतली होती काय, असाही सवाल यावेळी करण्यात आला. कामत यांनी या बेजबाबदार वक्तव्याबाबत एकतर माफी मागावी किंवा आपल्या पदाचा राजीनामा तरी द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
भाजप महिला मोर्चातर्फे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी गोवा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा मुक्ता नाईक, सरचिटणीस वैदेही नाईक, प्रदेश भाजप सचिव नीना नाईक व जिल्हा पंचायत सदस्य तथा प्रदेश भाजप सचिव शिल्पा नाईक हजर होत्या. कामत यांच्या म्हणण्यानुसार महिला समाज बदलू शकतात तर राजकारण का बदलू शकत नाहीत,असा सवाल मुक्ता नाईक यांनी केला. महिलांबाबत मुख्यमंत्र्यांच्या संकुचित मानसिकतेमुळेच विधानसभेतील एकमेव महिला आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांना मंत्रिपद मिळाले नाही काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला. केवळ राजकीय घराणेशाहीतील महिलांनी राजकारणात यावे व इतर सामान्य महिलांनी दूर राहावे, हे चूक आहे. आपल्या कर्तृत्वावर अनेक महिला राजकारणात आल्या आहेत. त्यांनी आपली वेगळी छाप भारतीय राजकारणावर उमटवली आहे, असे नीना नाईक म्हणाल्या. कामत यांच्या पत्नीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरण्यास भाजप महिला मोर्चाचा अजिबात आक्षेप नाही; पण स्वतःच्या पत्नीला मोकळीक देऊन अन्य महिलांना राजकारणात प्रवेश न करण्याचा सल्ला देणे हे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या.
गेल्या आठवड्यात विविध मागण्यांचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या महिला शिष्टमंडळाला "तुमच्या मतांची आपल्याला गरज नाही', असे सुनावून त्यांनी अपमानीत केले होते. आता महिलांच्या मतांचीही आपल्याला गरज नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे काय, असा सवाल नगरसेविका वैदेही नाईक यांनी केला. शशिकलाताई काकोडकर यांनी समर्थपणे मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळून महिलांची राजकारणातील ताकद सिद्ध करून दाखवली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य करणे त्यांना अजिबात शोभत नाही, असेही श्रीमती नाईक म्हणाल्या.
महिलांचा राजकीय प्रवेश कामत यांना मान्य नाही याचाच अर्थ ते ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात आहेत, असाच होतो. कामत यांच्या या वक्तव्याबाबत महिलावर्गात जागृती करून विद्यमान सरकार कशा पद्धतीने महिलांबाबत विचार करते,हे पटवून दिले जाणार आहे, असे जिल्हा पंचायत सदस्य व भाजपच्या प्रदेश सचिव शिल्पा नाईक यांनी सांगितले.

No comments: