Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 26 May, 2010

सरकारी बंगलेच बनलेत मंत्रालय!

पर्वरीचे सचिवालय ओस पडले
पणजी, दि. २५ (किशोर नाईक गावकर): पर्वरी येथील मंत्रालयात काही अपवाद वगळता बहुतेक मंत्री नित्यनेमाने फिरकत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मंत्र्यांच्या भेटीसाठी दुरून येणाऱ्या जनतेची तीव्र हेळसांड सुरू असून या प्रकाराबाबत जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत व वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा हेच मंत्रालयात नियमितपणे येतात. उर्वरित मंत्री आपल्या मर्जीप्रमाणे मंत्रालयात फिरकतात व आपल्या आल्तिनोे येथील सरकारी बंगल्यांवरून कारभार हाकतात अशीही खबर आहे. मंत्र्यांच्या या अशा कार्यपद्धतीमुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनाही वारंवार त्यांच्या बंगल्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याने तेही बरेच नाखूश आहेत, अशीही चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडी सरकारला पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. जनतेच्या अपेक्षा व आकांक्षांना या सरकारने पूर्णपणे पाने पुसली असून कामत यांचे आपल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे केवळ आपल्या खुर्चीला चिकटून बसण्यासाठी आपल्या मंत्र्यांचे थेर मुकाट्याने सहन करीत असल्याचा आरोपही विरोधी पक्षाने केला आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याने आठवड्यातील एक किंवा दोन दिवस मंत्रालयात येण्याचे निश्चित केले होते. सोमवारचा दिवस हा मुख्यमंत्र्यांनी जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी मग्रूर केला आहे व त्याप्रमाणे ते या दिवशी मंत्रालयात हजर असतात.वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा हे बहुतांश वेळ मंत्रालयात घालवतात व त्यामुळे ते जनतेला सहजपणे उपलब्ध होतात. बाकी उर्वरित एकही मंत्री निश्चित दिवशी मंत्रालयात हजर नसल्याने त्यांच्या भेटीसाठी आलेल्या लोकांना ताटकळत राहणे भाग पडते. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाने मंत्रालयच उकिरड्यावर टाकले आहे की काय,अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. प्रत्येक मंत्री आपल्या सरकारी बंगल्यावरून खात्याचा कारभार हाकतो. सगळ्या फाईल्स व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बंगल्यांवर पाचारण केले जाते व त्यामुळे या अधिकाऱ्यांची खात्यातील कामे अडकून पडतात.अनेकवेळी संध्याकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आलेल्या लोकांनाही भेट होत नसल्याने त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त केली जाते.केवळ मंत्रालयच नव्हे तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी खुद्द कॉंग्रेस भवनाकडेही पाठ फिरवली आहे. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी पक्षाच्या प्रत्येक मंत्र्याला आठवड्याचा एक दिवस कॉंग्रेस भवनात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी निश्चित केला होता. पण या वेळापत्रकाला या नेत्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्तेही या कारभाराला कंटाळले आहेत."जी-७' गटाचे राजकारण फुसका बार ठरल्यानंतर या गटातील एकही नेता मंत्रालयात दिसत नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या कार्यकर्त्यांचीच व मतदारसंघातील लोकांची जास्त गर्दी मंत्रालयात होत होती पण अलीकडे हे लोकही गायब झाल्याचे कळते.
सरकार कुठे आहे, असा सवाल जनतेकडून होतो आहे त्याचे मूळ कारण हेच आहे,अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे. जनतेला सामोरे जाण्याचे धारिष्ट एकाही मंत्र्यांत नाही व त्यामुळेच ते मंत्रालयात जनतेची भेट घेण्यास कचरतात.आपल्या स्वतंत्र बंगल्यांवर सगळ्या प्रकारचे "व्यवहार' करणे शक्य होते व त्यामुळे त्यांनी आपले सरकारी बंगलेच स्वतंत्र मंत्रालय बनवल्याचा टोलाही त्यांनी हाणला आहे. बाकी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे मात्र नेहमी व नित्यनेमाने आपल्या विरोधी पक्ष नेत्याच्या कक्षात हजर असतात. मंत्र्यांच्या भेटीला आलेले लोक वाट बघून कंटाळतात व नंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या कक्षात जाऊन तिथे या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा पंचनामा करतात, त्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीचा लेखाजोगा करण्याची आयतीच संधी विरोधी पक्षालाही प्राप्त होते.

No comments: