Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 9 December, 2009

गोव्यात नक्षलवादाची बिजे रोवण्याचे पाप करू नका

'उटा'च्या नेत्यांचा कामत सरकारला इशारा
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): गोवा राज्याला मिळालेल्या एका पुरस्कार वितरण कार्यक्रमांत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याची ओळख करून देताना "नक्षलवाद,दहशतवाद व जातीयवाद नसलेले गोवा हे एकमेव राज्य आहे' असे वर्णन केले होते. राज्यातील अनुसूचित जमात घटकांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून परावृत्त करून राज्यात नक्षलवादाची बिजे रोवण्याचे पाप कामत यांनी करू नये,असा सणसणीत इशारा आज "युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन'(उटा) ने दिला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी 'उटा'तर्फे काल ७ पासून बंदर कप्तान कार्यालयासमोर साखळी धरणे कार्यक्रमाला प्रारंभ केला आहे. काल काणकोण तालुक्यानंतर आज केपे तालुक्यातील अनुसूचित जमातीचे बांधव मोठ्या प्रमाणात या धरणे कार्यक्रमांत सहभागी झाले होते.यावेळी "उटा' चे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप, आमदार रमेश तवडकर तथा संघटनेचे इतर पदाधिकारी हजर होते.गेल्या २००३ सालापासून या आदिवासी जमातीला दर्जा बहाल होऊनही घटनेनुसार प्राप्त हक्क त्यांना देण्यास राज्य तथा केंद्र सरकार कुचराई करीत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.हा समाज विकासाच्या बाबतीत मागे राहिला असला तरी तो मूर्ख किंवा अज्ञान नाही याची जाणीव मुख्यमंत्री कामत यांनी ठेवावी,असे सांगून आत्तापर्यंत केवळ पोकळ घोषणा करून या समाजाला भुलवण्याचे प्रकार यापुढे अजिबात सहन करणार नाही,असेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले.दरम्यान,राज्य सरकारने खास आदिवासी कल्याण खाते तयार केल्याचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले आहे व पण याची काहीही खबर संघटनेला देण्यात आली नाही. सरकारने जर खरोखरच या खात्याची निर्मिती केली आहे तर मग मुख्यमंत्री किंवा समाज कल्याणमंत्री इथे येऊन त्याची खबर आंदोलनकर्त्यांना का देत नाहीत,असा सवाल यावेळी आमदार रमेश तवडकर यांनी केला.अनुसूचित जमात घटक आता पेटून उठला आहे याची चाहूल लागल्यानेच केवळ कागदोपत्री खात्याची केलेली निर्मिती या घटकाला शांत करणार नाही,याची जाणीव सरकारने ठेवावी,असेही ते म्हणाले.
-------------------------------------------------------------
पर्रीकरांचाही पाठिंबा
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज याठिकाणी भेट देऊन "उटा'ने आयोजित केलेल्या धरणे कार्यक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला. येत्या विधानसभा अधिवेशनात अनुसूचित जमातीच्या या मागण्यांचा पाठपुरावा करू,असे आश्वासनही त्यांनी दिले. भाजपचे आमदार रमेश तवडकर व वासुदेव मेंग गावकर यांच्याकडून वेळोवेळी अनुसूचित जमातीच्या न्याय्य हक्कांबाबत आवाज उठवला जातो पण सरकारकडून याबाबत कानाडोळा केला जाणे हे या लोकांचे दुर्दैव असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. यापुढे या समाजाकडून होणाऱ्या आंदोलनालाही भाजपचा पाठिंबा राहील,असेही आश्वासन पर्रीकर यांनी दिले.यावेळी त्यांच्यासोबत शिरोड्याचे आमदार महादेव नाईक हजर होते.

No comments: