Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 December, 2009

'उटा'कडे मडकईकर फिरकलेच नाही

पणजी, दि.१०(प्रतिनिधी): अनुसूचित जमातीला आपले न्याय्य हक्क पदरात पाडून घ्यायचे असतील तर सर्व राजकीय मतभेद विसरून समाजबांधवांनी एकत्र येणे अटळ आहे. सध्या कॉंग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आहे त्यामुळे या सरकारात सहभागी असलेल्या समाज नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्यापरीने सरकारवर दबाव आणून समाजाला न्याय देण्यासाठी झटले पाहिजे, असे आवाहन "उटा'तर्फे सुरू असलेल्या साखळी धरणे कार्यक्रमात करण्यात आले.
आज तिसवाडी व सासष्टी तालुक्यातील समाजबांधवांनी या धरणे कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी "उटा'चे अध्यक्ष प्रकाश वेळीप, आमदार रमेश तवडकर,आंतोन फ्रान्सिस, मामा कार्दोझ आदी नेते हजर होते. कुंभारजुवेचे आमदार तथा समाजाचे नेते पांडुरंग मडकईकर यांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभणार अशी अनेकांची अपेक्षा होती परंतु ते इथे फिरकलेच नाही. कॉंग्रेस पक्षाने अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव नेते असलेल्या श्री. मडकईकर यांना हटवून या समाजावर मोठा अन्याय केला आहे. श्री. मडकईकर यांचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर समाजाच्या नेत्यांनी व समाज बांधवांनी आंदोलनही केले पण त्याची दखल घ्यावी, असे सरकारला वाटले नाही. श्री. मडकईकर यांना मंत्रिपदावरून हटवून एकार्थाने कॉंग्रेसने या समाजाच्या स्वाभिमानालाच आव्हान दिले आहे व त्याचे परिणाम येत्या काळात या पक्षाला भोगावे लागणार आहेत, अशीही टीका यावेळी झाली.
राज्य सरकारने आदिवासी कल्याण खाते निर्माण केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे; ही गोष्ट जर खरी आहे तर मग राज्याचे समाज कल्याणमंत्री याठिकाणी उपस्थित राहून आंदोलकांना ही माहिती देण्यास का कचरतात, अशी टीका यावेळी "उटा'चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केली. आत्तापर्यंत समाजाच्या मागण्यांबाबत प्रसिद्ध झालेल्या घोषणा खऱ्या असतील तर समाजबांधवांना सामोरे जाण्यास हे सरकार का कचरते, अशी टीका करून अनुसूचित जमातीला मूर्ख बनवण्याचे प्रकार यापुढे अजिबात सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

No comments: