Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 December, 2009

भाजप महिला मोर्चाचे महागाईविरुद्ध आंदोलन सोमवारपासून निदर्शने

पणजी, दि. ११ (विशेष प्रतिनिधी): महागाईने कंबरडे मोडलेल्या महिलांपुढे आता संसार कसा करायचा, असा प्रश्न आऽऽ वासून उभा आहे. कॉंग्रेसच्या राज्यात दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या महागाईने सध्या २१ टक्के दरवाढीचा उच्चांक गाठला असून आता याविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाची सुरुवात १४ डिसेंबरला होणार असून यावेळी तिसवाडीतील महिलांतर्फे नागरी पुरवठा संचालकांना निवेदन देऊन व धरणे धरून निषेध नोंदविण्यात येणार आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला मोर्चाच्या अध्यक्ष मुक्ता नाईक यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, महिला मोर्चा सचिव वैदेही नाईक, उत्तर गोवा अध्यक्ष स्वाती जोशी, दक्षिण गोवा अध्यक्ष कृष्णी वाळके हजर होत्या.
याप्रसंगी बोलताना, नाईक म्हणाल्या की, "जेव्हा जेव्हा कॉंग्रेस सत्तेवर आली तेव्हा तेव्हा महागाई बरोबरच घेऊन आली, व ती पुढे वाढतच गेली. वाढत्या महागाईने आज अन्न, वस्त्र आणि निवारा या महत्त्वाच्या तीन मूलभूत गरजा कशा पूर्ण कराव्यात असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्याखाली आम आदमी,किंबहुना महिलावर्ग पूर्ण चिरडला गेला आहे. घर कसे चालवावे व स्वयंपाकघरात काय रांधावे या विवंचनेत महिला भरडली जात आहे. महागाईपुढे ठार बहिरे बनलेले सरकार व भाववाढीपुढे गुडघे टेकवलेले नागरी पुरवठा खाते यांना जाग आणण्यासाठी महिला हा लढा उभारणार आहेत असे नाईक यांनी नमूद केले.
पहिल्या फेरीत, वाढत्या महागाईविरुद्ध जनजागृती आणि निषेध प्रकट करणारे धरणे कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी पणजीत, १५ रोजी मडगावात, १६ रोजी म्हापशात, १७ रोजी वास्कोत आणि १८ रोजी डिचोलीत होणार आहेत.
यासंदर्भात बोलताना चोडणकर म्हणाल्या की, महागाई वाढतच आहे आणि त्यावर कळस म्हणजे अत्यंत खराब माल दुकानातून विकला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. खराब माल ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. हे सगळे घडत असताना नागरी पुरवठा खाते मात्र मूग गिळून गप्प आहे. या खात्याचे कुठल्याही व्यापाऱ्यावर नियंत्रण दिसून येत नाही. त्याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे काही वस्तूंचे दर सकाळी एक तर संध्याकाळी वेगळेच असतात. कित्येक दुकानदार सातत्याने वाढीव दर लावतात तरी हे खाते कोठे झोपा काढत आहे? आता महिलांनी निषेध म्हणून एखाद्या समारंभाला जाताना अस्सल दागिन्यांऐवजी कांदे, बटाटे, मिरच्यांची आभूषणे घालावीत. कारण या जीवनावश्यक वस्तू आता सोन्याइतक्याच महागड्या झाल्या आहेत!

No comments: