Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 9 December, 2009

लिबरहान अहवाल नेमका कोणी कोणासाठी लिहिला?

सुषमा स्वराज यांची घणाघाती टीका
नवी दिल्ली, दि. ८ : लिबरहान अहवालावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षाच्या उपनेत्या सुषमा स्वराज यांनी हा अहवाल पक्षपाती असल्याची टीका करीत सरकारने हा अहवाल फेटाळावा अशी जोरदार मागणी केली. भाजप आणि संघनेत्यांवर ठपका ठेवणारा हा अहवाल भाजप पूर्णतः फेटाळत असल्याचे त्यांनी सांगितले.
हा अहवाल न्या. लिबरहान यांनी लिहिलेला नसून तो अन्य कोणी तयार केलेला आहे, असा आरोप करून त्यांनी सभागृहात बॉम्बगोळाच टाकला. हा अहवाल न्या. लिबरहान यांनी वाचलेलाच नाही, हा आरोप सिद्ध करण्यासाठी स्वराज यांनी त्यांच्या दोन मुलाखतींचे उदाहरण दिले. टाइम्स ऑफ इंडियातील मुलाखतीत आपण अटलबिहारी वाजपेयी यांना दोषी धरलेले नाही,असे विधान करताना मुलाखतकाराने अहवाल लक्षपूर्वक वाचावा असा सल्लाही त्यांनी दिला होता. मात्र चार दिवसांनी"हिंदू'ला मुलाखत देताना त्यांनी आपली भूमिका बदलली व वाजपेयी का दोषी ठरतात यावर मल्लिनाथी केली.
न्या. लिबरहान यांना आपण नेमके काय देऊ केले आहे,असा थेट प्रश्न स्वराज यांनी गृहमंत्र्यांकडे पाहात विचारला. न्या.लिबरहान यांच्या कोणत्या मागण्या तुम्ही पूर्ण करणार आहात, माझ्या माहितीनुसार त्यांच्या यादीची लांबी मोठी आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनतील की एखाद्या राज्याचे राज्यपाल,असा प्रश्न करीत हे काही महिन्यांनी उघड होणारच आहे,असे स्वराज म्हणाल्या.
लिबरहान यांना वादग्रस्त वास्तूच्या पतनामागे कट असल्याचा कोणताच पुरावा मिळालेला नाही अथवा सीबीआयसह कोणत्याही तपास यंत्रणेला तसे पुरावे मिळालेले नाहीत. मुस्लिम संघटना अथवा केंद्र सरकार हे सिद्ध करू शकलेले नाही. रामजन्मभूमी आंदोलन हे जनआंदोलन होते. लिबरहान आयोगाच्या अहवालाने वस्तुस्थिती बदलत नाही. अडवाणी यांना लोकनेत्याची प्रतिमा देणारी रथयात्रा ज्या भागात गेली, तेथे त्या यात्रेचे भक्तिभावाने स्वागत झाले, महिलांनी आरती केली, रथ गेल्यानंतर तेथील मातीही पवित्र मानली गेली. मुलायमसिंग सरकारने रथ थांबविल्यावर कारसेवक पायी चालत पुढे गेले. स्थानिकांनी त्यांचे पाय धुतलेले मी पाहिले आहेत. लोकांनीच त्यांना आसरा दिला, अन्न दिले. मी या सर्व घटनांची साक्षीदार आहे,असे स्वराज म्हणाल्या. वातानुकूलित कक्षात बसून याचा अनुभव घेता येणार नाही,अशी कोपरखळी त्यांनी मारली.
बाबरी मशीद कारसेवकांनीच पाडली याबद्दल संशय नाही, पण तो कट नव्हता तर ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, राम हा देशाचा आत्मा आहे,असे स्वराज यांनी आपल्या घणाघाती भाषणात ठासून सांगितले. धर्मनिरपेक्षतेवर लिहायला लिबरहान यांना कोणी सांगितले? अहवालातील २६ पाने यावरच आहेत, तर संघ व भाजप संबंधावर त्यांनी प्रबंधच लिहिला आहे! या अहवालाने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण केली आहे,असा आरोप त्यांनी केला. हा अहवाल एखाद्या न्यायमूर्तींनी लिहिलेला नाही, तर संधीसाधूने राजकीय अहवाल लिहिला आहे,अशी मल्लिनाथी त्यांनी केली. हा अहवाल मिळायला ६,०३६ दिवस लागले. देशाचे पहिले पंतप्रधान पं.नेहरू यांनी देशावर ६,००० दिवस राज्य केले, त्याहूनही अधिक काळ लिबरहान यांना लागला, अशी टीका त्यांनी केली.

No comments: