पाळी, दि. १० (वार्ताहर): तळपीर येथे 'सेझा'तर्फे सुरू असलेल्या खाणीवरील वाहतूक बंद करण्यासाठी दिलेली १५ दिवसांची मुदत संपूनही कोणतीच पावले न उचलल्याने साखळी पालिकेने आज वाहतूक रोखून धरली. यात साखळीच्या नगराध्यक्ष सुनिता वेरेकर, उपनगराध्यक्ष रियाझ खान, नगरसेवक ब्रह्मानंद देसाई, यशवंत माडकर, आरती नाईक यांचा समावेश होता.
आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तळपीर येथे वाहतूक रोखण्यात आल्यावर साखळी पोलिस स्थानकाचे अधिकारी आत्माराम गावस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती डिचोली पोलिसांना देण्यात आली, त्यांनी उपजिल्हाधिकारी श्री. किनावडेकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी आंदोलनकर्ते आणि सेझा गोवाचे अधिकारी यांना आपल्या कार्यालयात बोलावून चर्चा केली. यावेळी सुनिता वेरेकर यांनी लोकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. जवळपास १२ वर्षे बेकायदेशीररीत्या सुरू असलेली ही खाण बंद करण्याची मागणी त्यांनी केली. सेझा गोवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी १४ डिसेंबर रोजी बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी १०.३० वाजता या विषयावर चर्चा केली जाणार असून तोपर्यंत खनिज वाहतूक बंद करण्याची पालिकेने केलेली मागणी मान्य करण्यात आली. यानुसार खाण कंपनीकडून आमोणा व इतर ठिकाणी होणारी खनिज वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, तळपीर येथील खाण व्यवसाय बंद करण्यासाठी गावठण, विर्डी आणि साखळीतील नागरिकांनी साखळी पालिकेवर दबाव आणला होता. सदर खाणीमुळे होणारे प्रदूषण, कोरड्या पडलेल्या विहिरी, शेतीत टाकाऊ माती पडून झालेले नुकसान आदी समस्यांची जंत्रीच नागरिकांनी पत्रकारांपुढे ठेवली होती. यानंतर पालिकेने खाण कंपनीला नोटीस पाठवून १५ दिवसांत वाहतूक बंद करण्यास बजावले होते. या व्यतिरिक्त बेकायदा खाण कंपनीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, खाण आणि औद्योगिक खात्याचे संचालक, पोलिस खाते तसेच आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, सभापती तसेच केंद्रीय खाणमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले होते.
Friday 11 December, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment