Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 December, 2009

आश्पाकचा तो मोबाईल गायब

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे हा म्हापसा न्यायालयीन कोठडीत असताना जो मोबाईल वापरत होता, तो गायब झाला असून त्या मोबाईलचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. आपण न्यायालयातून बाहेर निघताना एका तुरुंग रक्षकाकडे हा मोबाईल दिला होता, अशी माहिती आश्पाकने पणजी पोलिसांना पुरवल्याने या न्यायालयीन कोठडीमधील दोघा तुरुंग रक्षकांना पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज रात्री उशिरा पर्यंत त्याची चौकशी सुरू होता.
बिच्चू हल्लाप्रकरणात अटक करण्यासाठी पोलिस म्हापसा येथे आले असता आपल्याकडील तो मोबाईल एका तुरुंग रक्षकाकडे दिला, असे आश्पाकने आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही चौकशीसाठी तुकाराम पेडणेकर (मुख्य रक्षक) आणि मुकुंद गावस (रक्षक) यांना ताब्यात घेतले आहे, असे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले.
गेल्या अनेक महिन्यांपासून आश्पाक तुरुंगात मोबाईल वापरत होता. या मोबाईलवरून त्याने बिच्चू याच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली होती. तसेच तो अनेक गुंडाशी मोबाईलवरून संपर्कात होता, त्यामुळे तो मोबाईल या प्रकरणात जप्त करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. बिच्चू या गुंडावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी रमेश दलवाई याला "सुपारी' देण्यापूर्वी आश्पाकने "नूर' या गुंडाला सुपारी दिली होती. ही सुपारी त्याने मोबाइलवरूनच दिली होती, अशी माहिती मिळाली आहे.
न्यायालयीन कोठडीत कैद्यांपर्यंत मोबाईल पोचत असल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याने तुरुंग यंत्रणेची झोप उडाली आहे. आग्वाद तुरुंगात मोबाईलच नव्हे तर, अमली पदार्थही पोचवला जातो, असे आरोप करत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा अधिवेशनात यापूर्वी जोरदार आवाज उठवला होता. तसेच कडक उपाययोजना आखण्याची मागणी केली होती. परंतु, गृहखात्याने हा प्रश्न अद्याप गांभीर्याने घेतला नसल्याचे या घटनेनंतर उघड झाले आहे.

No comments: