Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 December, 2009

जनक्षोभामुळेच बाबरीचे पतन : राजनाथ

नवी दिल्ली, दि. ७ : बाबरी मशिदीचे पतन हा कारसेवकांच्या जनक्षोभाचा परिणाम होता, असा दावा करतानाच, अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी भगवान श्री रामाचेच मंदिर होते, आहे आणि यापुढेही असेल, असे भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी ठणकावून सांगितले. अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेची चौकशी करणाऱ्या न्या. लिबरहान आयोगाच्या अहवालावर आज लोकसभेत गरमागरम चर्चा करण्यात आली. बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला अटलबिहारी वाजपेयी हेही जबाबदार आहेत, अशी टीका सपाने केली. तर या प्रकाराला भाजपएवढीच कॉंग्रेसही तेवढीच जबाबदार आहे, असा घणाघाती हल्ला डाव्या कम्युनिस्टांनी चढवला.
कॉंग्रेस नेते जगदंबिका पाल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी परस्परांवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. भाजपला राममंदिरापेक्षा सत्ता जास्त प्यारी होती, असे कॉंग्रेस खासदार जगदंबिका पाल यांनी सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना जगदंबिका पाल हे देखील त्यावेळी कारसेवक म्हणून रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले होते, त्यांचे नावही लिबरहान आयोगामध्ये आहे, असा प्रतिहल्ला राजनाथसिंग यांनी चढवला.
लिबरहान आयोगाचा अहवाल सूडबुद्धीने लिहिलेला असून, आयोगाला राजकीय भाष्य करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. हा अहवाल म्हणजे घोडचुकांचा गुलदस्ताच आहे, असे सांगून अहवालात कशा चुकीच्या नोंदी आहेत, हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. बाबरी मशीद पाडण्याच्या कटाची माहिती जर लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयी यांनाच नव्हती, तर ती तत्कालीन कॉंग्रेस पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना कशी असणार, असा उलटसवाल कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला.

No comments: