Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 December, 2008

तब्येत सुधारल्याने अटलजी रिंगणात?


लखनौ, दि. २१ - सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याची घोषणा केलेले माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चांगली राहिली तर ते लखनौतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे त्यांच्या शुभचिंतकांचे म्हणणे आहे.
पाच राज्यांतील निवडणुकांनंतर आता सर्व स्तरावर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आजवर अटलजींनी लखनौ येथून लोकसभा निवडणूक लढविली. यापुढील निवडणुकीतही त्यांनीच या जागेवरून निवडणूक लढवावी, अशी विनंती या क्षेत्रातील अनेक मतदारांनी केली आहे. या आशयाची विनंती करण्यासाठी मतदारांचे एक प्रतिनिधीमंडळ दिल्लीला नुकतेच जाऊन आले.
या प्रतिनिधीमंडळाने म्हटले आहे की, अटलजींनी केवळ उमेदवारी अर्ज दाखल करावा, त्यांना विजय आम्ही मिळवून देऊ. याबाबत वक्तव्य देताना लालजी टंडन म्हणाले की, अटलजींच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. तब्येतीने साथ दिली तर लखनौतून अटलजी निवडणूक लढविण्यास तयार होऊ शकतात. केवळ प्रकृतीच्याच कारणावरून अटलजींनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला आहे. त्यांनी निवडणूक लढविणार नाही, असे कधीही म्हटले नाही. लखनौतील मतदारांसोबतच पक्षाचे कार्यकर्तेही अटलजींनीच निवडणूक लढवावी, या मताचे आहेत. लोकसभा निवडणूक एप्रिल-मेपर्यंत होईल. तोवर कदाचित वाजपेयींच्या प्रकृतीत अधिक सुधारणा होऊ शकते, अशी आशाही लालजी टंडन यांनी व्यक्त केली.

No comments: