पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्यावर दहशतवादी हल्ला होण्याची गुप्त माहिती असल्याने कडक सुरक्षा करण्याच्या प्रकरणामुळे, नुकतेच लग्न होऊन मालदीव येथे मधुचंद्रासाठी निघालेल्या गोमंतकीय जोडप्याला वास्को विमानतळावर लाखो रुपयांचा फटका बसल्याची घटना घडली आहे. याची लेखी तक्रार पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांच्याकडे करण्यात आली असून विमानतळावरील तपासणी करणाऱ्या सुरक्षा रक्षकावरच तक्रारदाराने संशय व्यक्त केला आहे.
सदर तक्रार नवविवाहितेची आई सौ. आशा पै यांनी केली आहे. हिऱ्याचे दोन रिंग, एक मंगळसूत्र, आजोबा व आजीचे नाव असलेले खानदानी दागिन्यातील एक सोन्याचे नाणे, एक डिजिटल कॅमेरा व ३ हजार रुपये चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार सौ. पै यांच्या मुलीचा विवाह गेल्या आठवड्यात मंगेशी येथे झाला. त्यानंतर काल सकाळी नवदांपत्य श्रीलंकन एअरलाईन्सद्वारे मालदीवला जाण्यासाठी वास्को विमानतळावर दाखल झाले. तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली तिच्या हातात असलेली पर्स तपासणीसाठी सुरक्षा रक्षकाने मागितली. यावेळी त्या पर्सला श्री. लोबो नामक एका अधिकाऱ्याने त्यांच्यासमोरच त्याला कुलूप लावले आणि ती तपासणीसाठी ताब्यात घेतली. तपासणी झाल्यानंतर पर्स ज्यावेळी हातात आली, त्यावेळी त्यातील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी ही घटना त्वरित श्रीलंकन एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. याबाबत पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेची त्वरित चौकशी करून विमानतळावर चोरीला गेलेले दागिन्याचा शोध लावण्याची मागणी सौ. पै यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे. विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी 'सीआयएफएस'कडे असून याची चौकशी करण्यासाठी त्या सुरक्षा यंत्रणेकडे संपर्क साधला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Wednesday 24 December, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment