Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 23 December, 2008

पाकची लढाऊ विमाने सज्ज

इस्लामाबाद, दि. २२ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणाकडे बघता इस्लामाबाद, रावळपिंडीसह अनेक प्रमुख शहरांवर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी आज युध्दाभ्यास केला.
यासंदर्भात पाकिस्तानी हवाई दलाचे प्रवक्ते एअर कमांडर हुमायून वकार झेपर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इस्लामाबाद, रावळपिंडीप्रमाणेच पाकिस्तानमधील इतर प्रमुख शहरांवर आज दुपारी हवाई दलाच्या अनेक लढाऊ विमानांनी युध्दाभ्यास केला. हा युध्दाभ्यास जवळपास २० मिनिटे सुरू होता. जारी करण्यात आलेल्या या निवेदनात अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
मुंबईवरील हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबासह अनेक दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले असून या दहशतवादी संघटनांसह पाकमधील त्यांची प्रशिक्षण केंद्रे पाकिस्तानने नष्ट करावीत, अशी मागणी भारताने वारंवार केलेली आहे. मुंबईवरील हल्ल्याला जी तत्त्वे जबाबदार आहेत त्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, असे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कालच काश्मीर दौऱ्यावर असताना म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आमच्या हवाईहद्दीचा भंग केला आहे, असा कांगावा पाकिस्तानने सुरू केला असून तसा औपचारिक निषेध भारताकडे नोंदविला आहे. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त सत्यब्रत पाल सध्या नवी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आलेल्या भारतीय राजदूतांच्या बैठकीला हजर राहण्यासाठी नवी दिल्ली येथे गेलेले आहेत तर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त शाहीद मलिक हे विचारविनिमयासाठी इस्लामाबाद येथे आलेले आहेत.
... आणि लोकांत घबराट
इस्लामाबाद, रावळपिंडीसह पाकमधील अनेक शहरांवर लढाऊ विमाने रोराऊ लागली त्यावेळी लोकांमध्ये एकच घबराट पसरली. लोकांनी वृत्तपत्र कार्यालये तसेच वृत्तवाहिनी कार्यालयांना फोन करून यासंदर्भात विचारणा केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थिती हाताळण्यासाठी भारतासमोरील सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कालच केले आहे, हे येथे उल्लेखनीय.

No comments: