Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 December, 2008

गोवा भयमुक्त: नाताळ, नववर्ष दणक्यात साजरे करा: जैस्वाल

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी): येत्या नाताळ व नववर्षांच्या पार्श्वभूमीवर गोव्याला दहशतवादी हल्ल्याचा कोणताही धोका नसून केवळ सावधानगिरीचा भाग म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैसवाल यांनी आज पत्रकारांसमोर केले.
आज त्यांनी येथील पोलिस मुख्यालयात भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोलिस मुख्यालयात मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक,पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार, पोलिस महानिरीक्षक किशनकुमार व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत मुख्यालयातील परिषदगृहात सुरक्षेबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला. गोव्यावर दहशतवादी हल्ला किंवा घातपाताच्या शक्यतेबाबत कोणतेही संकेत किंवा गुप्तचर अहवाल केंद्राला किंवा राज्य सरकारला मिळाला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाताळ व नववर्षांचा उत्साह साजरा करण्यास गोवा पूर्णपणे भयमुक्त असून तशी परिस्थिती ओढवलीच तर सुरक्षेचे सर्व ते उपाय आखण्यात आले आहेत. मुंबई हल्ला व देशात इतरत्र ठिकाणी घडलेल्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सावधगिरी बाळगण्यासाठीच सध्याची सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांनी अजिबात अस्वस्थ होण्याची गरज नाही. ही तयारी केवळ गोव्यापुरतीच नसून सर्व राज्यांत केल्याचे ते म्हणाले.
गोवा हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे काही प्रमाणात जास्त सावधगिरी बाळगण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. गोवा हे देशी व कायदेशीररीत्या विदेशातून आलेल्या पर्यटकांसाठी पूर्णपणे भयमुक्त ठिकाण असून या लोकांनी निर्धास्तपणे नाताळ व नववर्ष साजरा करावा,असे लोकांना आश्वस्त करणारे आवाहन त्यांनी केले.

No comments: