Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 23 December, 2008

भारत कठोर पाऊल उचलणार : मुखर्जी




.. पाकिस्तानातील अतिरेकी
घातक
..पाकने जबाबदारी ओळखावी

नवी दिल्ली, दि. २२ - पाकिस्तानातील अतिरेकी केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी घातक आहेत. दहशतवादाच्या निपटाऱ्यासाठी जागतिक समुदायाने केलेले प्रयत्न पुरेसे नसून यापुढे आता भारतच याबाबत ठोस पाऊल उचलणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.
भारतीय राजदूत आणि उच्चायुक्तांच्या संमेलनात मुखर्जी बोलत होते. ते म्हणाले की, काबूलमधील दूतावास आणि मुंबईवरील हल्ल्यानंतर हे पुरते सिद्ध झाले आहे की, पाकमधील दहशतवादाने आपले हात-पाय पसरले आहेत. त्यांचा हा विस्तार केवळ आशिया क्षेत्रासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी घातक आहे. आज सुदैवाने भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चांगली साथ मिळते आहे. दहशतवादाबाबत पाकने कठोर कारवाई करावी याविषयीचा दबाव सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदाय आणत आहे. एका तऱ्हेने ते भारताला मदतच करीत आहेत.
आता स्थिती बदलली आहे
पाकिस्तानने आपल्या भूमीत फोफावणाऱ्या दहशतवादाचा धोका ओळखला पाहिजे. आज आम्ही त्या दहशतवादाचे बळी ठरलोय म्हणून हे सांगत नाही, तर हा दहशतवाद उद्या संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेईल. त्यातून पाकिस्तान आणि तेथील लोकही सुटणार नाहीत.
भारताने आजवर पाकच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि प्रत्येकवेळी दहशतवादाचा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडविण्याचाच पर्याय समोर आणला. पण, हे सर्व २००१ पर्यंत ठीक होते. आता ती स्थिती राहिलेली नाही. पाणी डोक्याच्या वर गेले आहे. आता भारत खूप विचार करणार नाही. पाकिस्तानी प्रशासनाने आपल्या भूमीतील दहशतवाद निपटण्यासाठी दिलेला शब्द पाळला पाहिजे.
वारंवार पुरावे मागणारे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. जेव्हा एखाद्या खंडाचा एक भाग म्हणून आपण तेथे शांततेसाठी आश्वासन देतो तेव्हा त्याची अंमलबजावणी करणे, हीदेखील आपली नैतिक जबाबदारी ठरते. झरदारी या जबाबदारीला नाकारू शकत नाहीत, असेही मुखर्जी म्हणाले.

पश्चिम सीमा भागात
भारतीय लष्कर सतर्क
जैसलमेर, दि. २२ ः पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली जाणार नाही, हे भारताने स्पष्ट केले असले तरी पाकव्याप्त काश्मीरपाठोपाठ भारताच्या पश्चिम सीमेवरही भारतीय लष्कर आणि हवाईदल सतर्क झाले आहे.
पाकिस्तानने सीमा भागात लष्कराची जमवाजमव केली असल्याचे वृत्त मिळाल्यानंतर भारतानेही सावध पवित्रा घेत लष्कराची हालचाल सुरू केली आहे. याविषयी भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढविण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रामुख्याने जैसलमेर, भुज आणि उत्तरलाई भागात अधिक कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. येथील हवाई हद्दीची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

No comments: