Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 December, 2008

... तर पाक बेचिराख

नवी दिल्ली, दि. २५: वेळोवेळी दम देऊनही पाकिस्तान अतिरेक्यांचे तळ संपवणार नसेल, तर भारताला कठोर पावले उचलावीच लागतील. भारताशी युद्धाला सज्ज असण्याची भाषा पाकने करू नये. पाकने युद्ध पेटवलेच तर त्यात तो देशच बेचिराख होईल , असा सज्जड दम पश्चिम विभागाचे एअर कमांडिग ऑफिसर इन चीफ, एअर मार्शल पी. के. बोरबोरा यांनी भरला आहे.
कोणताही हल्ला परतवून लावण्याची क्षमता भारतापाशी आहे. दहशतवादी तळ नष्ट करायचे सोडून पाक युद्धासाठी चिथावणी देत आहे. तथापि, त्यांच्या युद्ध सरावाला पाहून आम्ही डरणार नाही , असेही बोरबोरा यांनी स्पष्ट केले.
उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे संदेश हवाई दलाला पोहचले आहेत. अत्याधुनिक रॉकेट आणि आधीच निश्चित केलेल्या लक्ष्यावर थेट मारा करणारे बॉम्ब सज्ज आहेत. तसेच वेळ पडली तर कारवाई आम्हाला सहज शक्य आहे. फक्त कारवाईच नाही तर पाकिस्तानी हवाई हल्ल्यापासून देशाला संरक्षण पुरवण्याचीही आमची क्षमता आहे , असा विश्वास बोरबोरा यांनी व्यक्त केला.
जगातील सर्वात मोठ्या चार हवाई दलांमध्ये भारतीय हवाई दलाचा समावेश होतो. दोन तासात देशातील सगळ्या प्रमुख शहरांना आणि संवेदनशील ठिकाणांना संरक्षण देण्याची ताकद आमच्यात आहे. भारताची पश्चिम एअर कमांड ही जगातल्या सर्वात मोठ्या आठ एअर कमांडपैकी एक आहे , असेही त्यांनी सांगितले.
सरकारने आदेश दिला तर पाकिस्तानात असलेले अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्यासाठीही तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पाच हजार जागा आधीच निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments: