Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 23 December, 2008

निष्क्रिय केंद्र सरकारमुळे पाक शेफारले - ठाकरे

मुंबई, दि. २१ - जोपर्यंत कॉंग्रेसचे सरकार या देशात राहील तोपर्यंत असेच चालणार, भारतात निष्क्रिय सरकार असल्यामुळेच पाकिस्तान शेफारले. आता केवळ आव्हाने देऊन चालत नाही, नुसते इशारे देऊन चालत नाही. हल्ला करुन बघा, हिंमत दाखवा, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारला बजावले आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर पहिली आणीबाणी पुकारा. कुणालाही सोडू नका. देशहितासाठी सांगतोय, असा उपाय त्यांनी सुचवला आहे.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज "सामना'मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
८२ वर्षांच्या शिवसेनाप्रमुखांनी या मुलाखतीत अत्यंत कडक भाषेचा वापर केला आहे. केंद्र सरकार व राज्यकर्त्यांवर त्यांनी कठोर टीका केली आहे.
सभांना गर्दी होते आमच्या, पण ती गर्दी होऊनसुद्धा परत कॉंग्रेसचेच सरकार येते. एवढ्या शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. भारनियमन आहेच. लोक काळोखात बसतील, चिडतील पण नंतर काही नाही. पुन्हा कॉंग्रेस... अशी खंत त्यांनी मुलाखतीत बोलून दाखवली आहे.
अमेरिकेत फक्त एकदा आणि लंडनमध्येही एकदा रेल्वे स्टेशनांवर बॉम्ब फुटले. एकदा आणि शेवटचेच... नंतर कुणाचीच तिकडे असे हल्ले करण्याची हिंमत झाली नाही. पहिल्यांदा तुम्ही हा देश सार्वभौम आहे ही भावना लक्षात घेतली पाहिजे. आमच्यात ती भावना मुळात आहे काय? कारण सार्वभौम देशाच्या संसदेवर हल्ला करणा-या अफझल गुरुला आपण अद्याप फाशी देऊ शकलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावूनही ताबडतोब जर त्या अफझलला फाशी दिली असती तर तुमची हिंमत कळली असती. कसली अडचण आहे अफझल गुरुला फाशी देण्याची ? कसला दबाव आहे तुमच्यावर ? मुसलमानांच्या मतांच्या लाचारीसाठी ते हे करीत आहेत, याची मला चीड आहे, असे त्यांनी सांगितले आहे. या मुलाखतीबद्दल साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता होती. पहिल्या भागात ठाकरे यांनी कॉंग्रेसवर जहरी टीका केली असून आपली निवृत्ती म्हणजे जे होईल ते सहन करणे नव्हे, अशी तंबी दिली आहे.

No comments: