Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 December, 2008

पाकिस्तानी फौजा सीमेवर

नवी दिल्ली व इस्लामाबाद, दि. २५: मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर बिघडत चाललेल्या भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधांची गाडी धोक्याच्या वळणावर पोहोचली आहे. आतापर्यंत भारताला केवळ शाब्दिक धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने राजस्थानलगतच्या सीमेनजीक सैनिकांच्या अनेक तुकड्या दाखल केल्या असून आघाडीच्या हवाई तळांवर लढाऊ विमानेही सज्ज ठेवली आहेत. त्यापाठोपाठ केंद्रातील डॉ. मनमोहनसिंग सरकारने राजस्थानच्या सीमाभागातील गावांना कधीही स्थलांतरास सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उभय देशांच्या फौजा आमने-सामने डोळ्याला डोळा भिडवण्याच्या स्थितीत येतील, अशी चिन्हे आहेत.
मुंबईवरील हल्ल्यामागे आपल्याच देशातील दहशतवादी असल्याचे सत्य कबूल करण्यास पाक अद्याप तयार नाही. त्यातूनच उभय देशांतील संघर्ष चिघळत चालला आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या नेत्यांची वक्तव्ये 'युद्ध होणार नाही' असा सूर लावणारी होती. मात्र बुधवार उजाडला आणि तो सूर बदलत गेला. लाहोर, कराची व इस्लामाबाद या प्रमुख शहरांवर पाकच्या लढाऊ विमानांनी मंगळवारीही टेहळणी घिरट्या घातल्याचे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ महत्त्वाची खबर आली ती पाक सैनिकांच्या तुकड्या बाडमेरजवळच्या सीमेवर दाखल होत असल्याची. आतापर्यंत या प्रदेशात पाकचे केवळ रेंजर्सच तैनात होते. मात्र, बुधवारी त्यात सैनिक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भर पडली. सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बंसल यांनी स्वत: त्यास दुजोरा दिल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले.
या प्रकाराची तातडीची दखल केंद सरकारने घेतली आणि राजस्थान सरकारला पत्र धाडले. 'पाक सैन्याचा हालचाली पाहता सीमेलगतची गावे इतरत्र स्थलांतरीत करण्याची वेळ कधीही येऊ शकते. त्यासाठी तयार रहा' असे त्या पत्रात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने केलेल्या हालचालींची माहिती रात्री उशिरापर्यंत हाती आली नव्हती.

No comments: