Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 September, 2008

शिरगाव खाणींतील पाणी गावकऱ्यांना धोकादायक

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) : शिरगाव येथील खाणींत साठलेले पावसाचे पाणी खाणींवरील कामगारांना आणि गावकऱ्यांसाठी धोकादायी असल्याने ते त्वरित बाहेर काढणे गरजेचे असल्याचा अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास खाण सुरक्षा उपसंचालकांनी सादर केला. तथापि, त्यास विरोध करून याविषयीचे प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे याचिकादाराने खंडपीठाला सांगितले. खाण सुरक्षा संचालनालयाने खाणीत साठलेल्या पाण्याची पातळी धोकादायी असल्याचा अहवाल दिला असताना त्यास विरोध का, असा प्रश्न खंडपीठाने याप्रसंगी उपस्थित केला.
गोव्यात यापूर्वी खाणींचे पाणी गावात शिरल्याने दुर्घटना घडली होती, अशी माहिती सरकारने न्यायालयाला दिली. शिरगावातील खाणींचे ढिगारे भेगाळले असून ते फुटले तर खाणींतील पाणी गावात शिरू शकते, अशी माहिती सरकारने काल खंडपीठास दिली होती. पाण्यामुळे खाणी धोकादायी बनल्याची पुरवणी याचिका दाखल झाल्यानंतर सरकारने ही माहिती खंडपीठाला पुरवली होती. त्यामुळे शनिवारी त्याबाबत पाहणी करून सोमवारपर्यंत खाणींबाबत संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश खाण सुरक्षा उपसंचालकांना खंडपीठाने दिला होता. मात्र पाणी बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला याचिकादाराने विरोध दर्शवल्यामुळे प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर याविषयी पुढील सुनावणी येत्या मंगळवारी ठेवण्यात आली आहे.

No comments: