Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 16 September, 2008

बस तिकीट दरवाढीच्या मुद्यावरून कदंब व खाजगी बसमालक यांच्यात कलगीतुरा

पणजी, दि.१५ (प्रतिनिधी): बसतिकिट दरवाढीवरून सध्या खाजगी बसमालक व कदंब महामंडळ यांच्यात जणू अप्रत्यक्ष राजकारण सुरू झाले आहे. कदंब महामंडळाकडून २५ टक्के दरवाढ देण्याच्या प्रस्तावावर सरकारने ५ टक्के वाढ देण्याचे मान्य केले असताना आता या तोडग्यास खाजगी बसमालकांनी तीव्र विरोध केला आहे. एकतर २५ टक्के वाढ द्या, अन्यथा दरवाढच नको,अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
गोवा सरकारने बसतिकीट दरवाढीबाबत चर्चा करून किमान ५ टक्के दरवाढ करण्याचे तत्वतः मान्य केले आहे. डिझेल दरवाढीचा सर्वांत जास्त फटका हा कदंब महामंडळाला बसत असल्याने त्यांच्याकडून या वाढीबाबत सरकारकडे आग्रह धरण्यात आला आहे. सद्यस्थितीत दरवाढीच्या या एकूण प्रकरणात खाजगी बसमालकांनी प्रत्यक्ष भाग घेतलेला नाही. कदंब महामंडळाने २५ टक्के दरवाढ सुचवली असली तरी प्रत्यक्ष कदंब महामंडळाला होणारे नुकसान हे केवळ डिझेलदरामुळे नव्हे तर महामंडळाच्या एकूण कारभारामुळे होत आहे. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी हा बोजा प्रवाशांवर लादणे योग्य होणार नाही, अशी भूमिका वाहतूक खात्याने घेतली आहे. वाहतूक खात्याने ५ टक्के वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पहिल्या पाच किलोमीटरवर ४.५० रुपये तर उर्वरित किलोमीटरसाठी ५ पैसे वाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या क्षुल्लक दरवाढीचा कोणताही फायदा बसमालकांना होणार नाही, उलट या वाढीमुळे सुट्टे पैशांचे संकट निर्माण होणार आहे. ही दरवाढ केली तरी प्रवाशांकडून ४ रुपयेच आकारले जातील. या बदल्यात किमान ५ रुपये व पुढील किलोमीटरसाठी १० पैसे अशी वाढ करावी,असे उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सचिव प्रदीप ताम्हणकर यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले. नाममात्र दरवाढ देऊन विनाकारण घोळ घालण्यापेक्षा ही वाढच नको, असेही खाजगी बसमालकांनी ठरवले आहे.
याप्रकरणी कदंब महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी खाजगी बसमालकांकडून तिकीट दरवाढीबाबत राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. वेळोवळी तिकीट दरवाढ झाल्यानंतर प्रवाशांकडून कमी तिकीट आकारायचे व कदंब महामंडळाच्या बसगाड्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या गाड्यांतून न्यायचे ही त्यांची सवय बनली आहे. २५ टक्के दरवाढ झाल्यास किमान दोन ते तीन रुपये तिकीट वाढणार आहे व त्यामुळे प्रवाशांना सध्याचे दर आकारल्यास कदंब गाड्यांत प्रवासी येणार नाहीत. याचमुळे त्यांनी ही शक्कल लढवल्याचे ते म्हणाले. सरकारने तिकीट दर निश्चित केले असताना त्याची कार्यवाही सक्तीने करण्यासंबंधी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. खाजगी बसवाल्यांकडून प्रवाशांना तिकीट देणे व सरकारी दराप्रमाणे दर आकारणे होते आहे की नाही, याची शहानिशा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सरकारने जर याप्रकरणी उपाययोजना आखल्या नाहीत तर कदंब महामंडळाची परिस्थिती आटोक्यात येणे शक्य नसल्याचे मतही सदर अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
-----------------------------------------------------
आजची बैठक लांबणीवर
तिकीट दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उद्या १६ रोजी राज्य वाहतूक प्राधिकरणाची बोलावलेली बैठक एक आठवडा लांबणीवर पडली आहे. ही बैठक आता पुढील सोमवारी २२ रोजी होणार आहे,अशी माहिती वाहतूक संचालक पी. एस. रेड्डी यांनी दिली.

No comments: