Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 20 September, 2008

'मरूसागर एक्सप्रेस' उडवण्याची धमकी

प्रत्येक थांब्यावर कसून तपासणी वेळापत्रक कोलमडले
पणजी, दि. १९ (सागर अग्नी यांजकडून): काल परवाच दिल्लीत घडलेल्या बॉम्बस्फोटानंतरच्या जखमांची खपलीही अद्याप निघाली नाही तोच दहशतवाद्यांनी "मरूसागर एक्सप्रेस' (जयपूर - एर्नाकुलम व एर्नाकुलम - जयपूर) या दोन्ही गाड्या सोमवारपर्यंत उडविण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोटा राजस्थान येथे मिळालेल्या या धमकीमुळे गुजरात, महाराष्ट्र, गोवा , कर्नाटक व केरळ राज्याच्या सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ज्या ठिकाणी या गाड्या थांबे घेतील त्या त्या ठिकाणी त्यांची कसून तपासणी करूनच त्यांना पुढच्या प्रवासासाठी हिरवा कंदील दाखविला जात आहे. परिणामी या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे.
कोटा राजस्थान येथे रेल्वे पोलिस कक्षात आज दुपारी जयपूरवरून गाडीने एर्नाकुलमकडे कूच करताच सर्वप्रथम दूरध्वनी खणखणला व पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने जयपूरवरून निघणारी "२९७७ डाऊन' व त्याचवेळी एर्नाकुलमवरून जयपूरला जायला निघणारी "२९७८ अप' या दोन्ही मरूसागर गाड्या सोमवारपर्यंत उडवून देण्याची धमकी दिली. धमकीच्या या संदेशानंतर कोटा पोलिसांनी ताबडतोब सर्व ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे माहिती देऊन संबंधित राज्यातील सुरक्षा यंत्रणांना सावध केले. कोटा पोलिसांनी बडोदा पोलिस तर बडोदा पोलिसांनी मुंबई पोलिसांना या धमकीची माहिती दिली. या गाडीच्या मार्गावर ठिकठिकाणी कडेकोट पाळत ठेवण्यात आली असून मुंबई पोलिसांनी रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी रेल्वे पोलिसांना माहिती पुरविली तर गोवा पोलिसांना सिंधुदुर्ग पोलिसांकडून संदेश दिला गेला. अशा पद्धतीने हा संदेश एर्नाकुलमपर्यंत पोचविण्यात आला. दोन्ही गाड्यांची कसून तपासणी केली जात असल्याने या गाड्यांचा वेग कमालीचा मंदावला आहे.
२९७७ डाऊन या गाडीने दुपारी जयपूर तर परतीच्या प्रवासातील २९७८ अप या गाडीने एर्नाकुलम स्थानक सोडले आहे. धमकी देणाऱ्याने या गाड्या सोमवारपर्यंत उडविण्याची धमकी दिल्यामुळे सुरक्षा यंत्रणेला डोळ्यात तेल घालून सतर्क राहावे लागले. गोवा पोलिसांनीही संदेश मिळाल्याचे सांगून गोव्यात दाखल होणाऱ्या तसेच गोव्यातून निघणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जयपूरहून निघालेली गाडी उद्या पहाटे ३ च्या सुमारास मुंबईतील विरार स्थानकामध्ये पोचणार असून सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आली आहे.
गोव्याचे पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही या गाड्यांच्या तपासणीची सर्वतोपरी तयारी ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यातील "प्रवेश' व "निर्गमन' अशा दोन्ही पॉंईटवर त्यांची तपासणी केली जाणार असून गोव्यात ज्या ठिकाणी ही गाडी थांबे घेईल तेथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गाड्यांच्या तपासणीसाठी अतिरिक्त सुरक्षा बळाचा वापर केला जाणार नाही, असे स्पष्ट करून गोवा पोलिसांकडूनच तपासणीचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारपर्यंत या गाड्या उडविण्याच्या दहशतवाद्यांच्या धमकीमुळे त्यातून प्रवास करणाऱ्यांची व त्यांच्या नातेवाइकांची भीतीने गाळण उडाली आहे तर, धमकी देणाऱ्यांनी निश्चित वेळ किंवा ठिकाणही स्पष्ट केले नसल्याने या गाड्या त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या स्थानकावर येईपर्यंत सुरक्षा यंत्रणांवरील दबाव कायम राहणार आहे. दरम्यान प्रत्येक थांब्यावर गाड्यांची तपासणी केली जात असली तरी दोन थांब्यांदरम्यान मधल्या वाटेत गाड्यांना सुरक्षा कशी पुरवायची या विवंचनेत सध्या सुरक्षा यंत्रणा सापडली आहे.

No comments: