Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 16 September, 2008

संशयितांविरुद्ध आरोप सिद्ध: खैरलांजी हत्याकांड

भंडारा, दि. १५ : महाराष्ट्रात गाजलेल्या खैरलांजी हत्या प्रकरणी आज येथील सत्र न्यायालयाने निवाडा देताना आठ संशयित आरोपींना दोषी ठरवले. एका दलित कुटुंबातील चार व्यक्तींची हत्या केल्याचा आरोप या आठ जणांवर ठेवण्यात आला होता.
सदर प्रकरण निकालात काढताना प्रथम श्रेणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी गोपाळ बिंजेवर, सक्रू बिंजेवर, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, रामू धांडे, जगदीश मांडलेकर, प्रभाकर मांडलेकर आणि शिशपाल धांडे यांना भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले.
या प्रकरणातील इतर तीन संशयित आरोपी महीपाल धांडे, धर्मपाल धांडे व पुरुषोत्तम तिटामरे यांना सोडून देण्यात आले. न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती नियम १९८९ ला अनुसरून वरील तिन्ही संशयित आरोपींचे कृत्य अमानुष असल्याचे न्यायालयात सिद्ध न झाल्याने त्यांना मुक्त करण्यात आले.
दरम्यान, संशयितांना आरोपी म्हणून सिद्ध करण्यात आले असून त्यांना २० सप्टेंबर रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
सुरेखा भय्यालाल भोतमांगे, तिची कन्या प्रियांका आणि मुलगे सुधीर व रोशन यांची २९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजी येथे जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. सुरेखाचा पती भय्यालाल घटनास्थळावरून पलायन करण्यात सफल झाल्याने त्याचे प्राण वाचले होते. भय्यालालच्या कुटुंबीयांना अमानुषपणे मारून त्यांचे मृतदेह एका नाल्यात फेकून देण्यात आले होते.

No comments: