Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 1 January, 2011

सरकारचा दावा फोल

कांदे ६० तर व टोमॅटो ५० रु. किलो

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)
आम आदमीची महागाईने चाललेली ससेहोलपट ध्यानात घेऊन सरकारने कांदे व इतर भाज्या स्वस्त दरात विकण्याचा दावा मोठा आव आणून केलेला असला, तरी आज पणजी बाजारात कांदे ६० रुपये तर टोमॅटो ५० रुपये प्रतिकिलो या दराने विकण्यात येत होते. अन्य भाज्यांचा दर प्रतिकिलो ३० रुपयांच्या आसपास होता. त्यामुळे कॉंग्रेसच्या सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारने कांद्यासह इतर भाज्यांचे दर नियंत्रित केल्याचा दावा फोल ठरला आहे.
कांद्याच्या भरमसाठ दरवाढीमुळे हतबल झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने लोकांना ३० रु. दराने कांदा उपलब्ध करून दिल्यानंतर लोकहितापासून दूरच राहणार्‍या कॉंग्रेसने लवकरच कांदे स्वस्त होतील; तसेच आपण २५ रु. दराने कांदे उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मोठ्या आवेशात केली होती. मात्र ही घोषणाही कॉंग्रेसच्या नेहमीच्याच दाव्यांप्रमाणे वार्‍यावर विरून गेली आहे. लोक नव वर्षाच्या स्वागतात दंग असतानाच गेले अनेक दिवस कांद्याचे वाढलेले भाव कमी करण्याचा आटापिटा करणार्‍या सत्ताधार्‍यांना अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे नव्या वर्षांत या सरकारकडून आणखी कोणती अपेक्षा करणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, सध्या बाजारात ६० रु. दराने मिळणारा कांदा ओला असल्याने वजनाला कमी, म्हणजेच कमी नगात येत असल्याने गृहिणी हतबल झाल्या आहेत.

No comments: