Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 27 December, 2010

सोपा कर भरमसाठ, स्वच्छतेकडे दुर्लक्ष

मासेविक्रेत्या महापालिका कारभारावर संतप्त
पणजी,दि.२६ (प्रतिनिधी)
‘पणजी महापालिका सोपा कर भरमसाठ प्रमाणात गोळा करते परंतु मार्केटातील साफसफाईकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. मासळी मार्केटाची योग्यरितीने निगा राखल्यास कोणालाही कसलाच त्रास होणार नाही. पण महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे दर दिवशी या समस्या निर्माण होत असतात. हॉटेलात बेकायदा राहणार्‍या परप्रांतीय संदर्भात संबंधित हॉटेलमालकाला काहीच विचारले जात नाही. म्हणून एक दिवस आम्ही त्या हॉटेल मालकाला जाब विचारण्यासाठी गेलो असता एका खोलीत दहा ते बारा लोक झोपलेले आढळले. अशा अंदाधूंद आणि पैशाच्या लोभापायी केलेल्या कृतीमुळे या समस्या निर्माण होत असून महानगरपालिकेचे मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते’अशी संतप्त प्रतिक्रिया मासळी विक्रेत्या महिलांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. .
पणजी महापालिकेच्या गचाळ कारभारामुळे पणजी बाजारातील मासळी मार्केटात दर दिवशी अनेक समस्या निर्माण होत असून सत्ताधार्‍यांना मासळी मार्केटाकडे लक्ष द्यायला वेळच नाही,अशी टीकाही या विक्रेत्यांनी केली.
दर दिवशी मार्केटातील चिकन मटण विक्री करणार्‍या दुकानातील कचरा, घाण, मासळी विक्रेत्यांच्यासमोर आणून टाकला जातोे व दुसर्‍या दिवशी तो पालिकेचे कामगार घेऊन जातात. आज रविवार असल्यामुळे सदर कचरा तसाच पडून राहिला, त्यामुळे त्याची दुर्गंधी संपूर्ण मार्केटभर पसरली तर दुसर्‍या बाजूने मासळी मार्केटजवळ असलेल्या एका हॉटेलात बेकायदा परप्रांतीय लोक राहत आहेत. शिवाय त्या हॉटेलचे सांडपाणी बाहेर जाण्याची पाइपलाइन फुटल्याने सदर पाणी गटारातून जाण्याऐवजी मासळी मार्केटात असलेल्या जी. मणेरीकर यांच्या देवयानी जनरल स्टोअरसमोर पाझरते, त्यामुळे मासळी विक्रेत्या महिलांनी संतप्त होत पत्रकारांना तेथील स्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली.
यावेळी महापालिकेच्या विरोधी गटातील नगरसेविका वैदेही नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तात्पुरती सोय म्हणून हॉटेलातून गळणारे सांडपाणी बंद करणे व मार्केट परिसरात साफसफाई करण्याची व्यवस्था करून दिली.
यावेळी नगरसेविका सौ. नाईक म्हणाल्या की महानगरपालिका जरी पणजीची असली तरी पालिकेतील सत्ताधारी लोकांनी पणजी शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे ही महापालिका पणजीची की ताळगावची हे कळणे मुश्कील झाले आहे. हा कचर्‍याचा ढीग आणि हॉटेलमधून गळणारे घाण पाणी म्हणजे मार्केटात मासळी विक्रीवरून आपले पोट भरणार्‍या या महिलांना नाताळानिमित्त दिलेली भेेट आह.े त्यामुळे येत्या निवडणुकीत या भेटीचा वचपा मतदारांनी काढावा असे आवाहन त्यांनी केले. सुमारे तीन तास स्वतः घटनास्थळी थांबून सौ. नाईक यांनी सदर कचरा आणि सांडपाण्याची तात्पुरती व्यवस्था करून दिली.

No comments: